मुंबई – राजकारणाचा अर्थ दुर्देवाने सत्ताकारण असा करण्यात आला आहे. राजकारण म्हणजे राष्ट्रकारण, समाजकारण, विकासकारण, धर्मनीती आहे. राजकारण हेच समाजकारण आहे, असे समजून कृषी क्षेत्रासाठी, शिक्षण, सांस्कृतिक कला, क्रीडा या सगळ्या क्षेत्रांसाठी आणि त्यातील गुणवत्ताधारकांच्या पाठिशी कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता पाठिशी उभं राहणारे महाराष्ट्राचे नेतृत्व म्हणजे शरद पवार असे उद्गार नितीन गडकरी यांनी काढले.
डॉ पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने 125 रुपयाचे नाणे जारी केले. त्या नाण्याचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याशिवाय माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाचा पुरस्कार शिवाजी शिक्षण संस्थेच्यावतीने देण्यात आला. त्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते.
नितीन गडकरी म्हणाले, डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कृषी क्षेत्रात मोठे नाव आहे. शरद पवार यांचेही मोठे नाव आहे. पंजाबराव देशमुखांच्या नावाने शरद पवार यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्यामुळे आता पुरस्काराने आणखी मोठी उंची गाठली आहे. पण, शरद पवार यांच्या उंचीची माणसं दरवर्षी कुठं मिळणार, असेही ते म्हटले.
पंजाबरावांची तळमळ, व्हिजन ही शरद पवार यांच्याकडे आहे. राजकीय धुळवड सुरू असते. मात्र, या राजकीय धुळवडीत डॉ. पंजाबराव देशमुख, शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांचे नाव, कार्य सामान्यांच्या कायम लक्षात राहते असेही गडकरी यांनी म्हटले.
आताचा शेतकरी ऊर्जादाता
मोठ्या शहराची लोकसंख्या वाढत चालली आहे. यात ग्रामीण भागाचे लोकं आता शहराकडे स्थलांतरीत होत आहेत. विकासाचे मूल्यमापन हे शेतीतून किती आणि इतर क्षेत्रामधून किती हे पाहून होते. गावातील शेतकऱ्याचा विकास झाला पाहिजे, या भावनेतून डॉ. पंजाबराव देशमुख यांनी त्यावेळी कार्य केले. राजकारणी माणूस हा पाच वर्षांचा विचार करतो, पण डॉ. पंजाबराव देशमुख यांनी भविष्याचा विचार केला. आपला शेतकरी आता ऊर्जादाता झाला आहे. शेतकरी आता डांबर पण तयार करत असल्याचे गडकरी यांनी म्हटले.