नवी दिल्ली – देशातल्या विविध राज्यांतील मुख्य सचिवांची तीन दिवसांची बैठक आजपासून दिल्लीत सुरू झाली उद्या गुरूवारी व शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेच्या अध्यक्षस्थानी असतील. अशा प्रकारची ही तिसरी परिषद आहे; पहिली बैठक जून २०२२ मध्ये धर्मशाला येथे आणि दुसरी बैठक दिल्लीत झाली होती.
केंद्र आणि राज्य सरकारांमधील सहभागात्मक प्रशासन आणि भागीदारीला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्य सचिवांच्या अशा परिषदा आयोजित केल्या जातात. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत केंद्र सरकारचे प्रतिनिधी, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी यांच्यासह 200 हून अधिक लोकांचा यात सहभाग असेल. वितरण यंत्रणा बळकट करून ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही लोकसंख्येसाठी जीवनाचा दर्जा चांगला राखण्यासाठीच्या विविध उपाययोजनांवर यावेळी चर्चा होणार आहे असे पंतप्रधान कार्यालयाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
या वर्षी मुख्य सचिवांच्या राष्ट्रीय परिषदेचे मुख्य उद्दीष्ठ ‘इज ऑफ लिव्हिंग’ असेल. या परिषदेत राज्यांच्या भागीदारीत सामायिक विकास अजेंडा आणि ब्ल्यू प्रिंटचा आराखडा तसेच अंमलबजावणी यावर भर दिला जाईल. जमीन आणि मालमत्ता; वीज; पिण्याचे पाणी; आरोग्य आणि शालेय शिक्षण या क्षेत्रातील सुधारणांवर यावेळी विशेष चर्चा केली जाणार आहे. सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धीमत्ता अशा विषयांवरही यावेळी चर्चा सत्रे होणार आहेत.