नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिन सोहोळ्याच्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला केंद्र सरकारने या वर्षी अनुमती नाकारली आहे. गेल्यावेळीही महाराष्ट्राच्या चित्ररथाला अनुमती नाकारण्यात आली होती.
त्यामुळे यंदा राज्याला संधी मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, पण याही वेळी महाराष्ट्राच्या वाट्याला नकारच आला आहे. यंदा महाराष्ट्राने जैवविविधतेतील मानके या विषयावर चित्ररथ साकारण्याचे योजले होते. सुरक्षेचे कारण देत महाराष्ट्राला ही अनुमती नाकारण्यात आली आहे.
दिल्लीत राजपथावर विविध राज्यांच्या चित्ररथांचे संचलन प्रजासत्ताक दिनी होत असते. त्यात विविध राज्यांना आपल्या प्रगतीची माहिती देशापुढे आणण्याची संधी मिळत असते. महाराष्ट्राचा चित्ररथ नेहमीच या संचलनाचा आकर्षण बिंदू असतो.
सन 2015 पासून महाराष्ट्राच्या चित्ररथाला दोनदा पहिल्या क्रमाकांचा पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्राबरोबरच केरळ, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या चित्ररथाला अनुमती नाकारण्यात आली आहे.