मुंबई – करोना आणि त्याच्या नवनव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद ठेवणे अयोग्य असल्याचे मत जागतिक बॅंकेचे शिक्षण विषयक संचालक जैमी सावेंद्र यांनी व्यक्त केले. शाळा सुरु केल्यामुळे कोरोना ससंर्ग होतो किंवा करोनाचे रुग्ण वाढतात याला पुरावा आढळत नाही. शाळा सुरक्षित नाहीत, असेही म्हणता येत नसल्याचे त्यांनी नमूद केले.
मुलांचे लसीकरण होईपर्यंत शाळा बंद ठेवाव्यात अशा सूचना केल्या गेल्या आहेत. मात्र यामध्ये कोणतंही शास्त्रीय कारण नसल्याचे जैमी सावेंद्र यांनी स्पष्ट केले. शाळा आणि करोनाची लाट यांचा संबंध जोडणे योग्य नसून त्यामागे कोणताही शास्त्रीय पुरावा नसल्याचे जैनी सावेंद्र यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.
त्यांनी रेस्टॉरंट, बार आणि शॉपिंग मॉल सुरु आहे आणि शाळा बंद ठेवण्यात आल्यात, हे कसे चालणार असा सवाल केला. जागतिक बॅंकेच्या अंदाजानुसार आता शाळा सुरु असतील तर त्या विद्यार्थ्याच्या दृष्टीने अधिक सुरक्षित आहेत. तर, बंद ठेवल्या तर त्या जास्त धोकादायक ठरतील, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
2020 मध्ये करोना लाट आली त्यावेळी आपल्याला करोना संसर्गाशी कसं लढायचे हे माहिती नव्हते. आता आपल्याला संसर्गाला कसे सामोरे जायचे याची माहिती आहे. आता 2020 आणि 2021 मधील परिस्थिती वेगळी असून काही देशांनी करोना संसर्गाच्या लाटा येऊनही शाळा उघडल्या आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.