– दत्तात्रय गायकवाड
वाघोली -पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांमध्ये नगरसेवक पदाच्या निवडणुका, राजकीय पक्षातील संभ्रमावस्था, विकास कामांसाठीचा निधी, तसेच आगामी विकास आराखड्यानुसार भागाचा विकास होणार कधी? याबाबतीत सुरू असलेला गोंधळ थांबणार कधी? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
निवडणुकांमध्ये गोंधळाची स्थिती….
पुणे महानगरपालिकेत 23 गावांचा समाविष्ट होऊन अनेक महिन्यांचा कालावधी लोटला आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका होणार कधी, असा संभ्रम लोकप्रतिनिधी व नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. प्रभागरचना करताना नव्याने जोडलेला हा भाग पूर्वीच्या मतदारसंघात राहणार की मागील पहिल्या टप्प्यातील अकरा गावांच्या बाबतीत झालेल्या निवडणुकीप्रमाणे या 23 गावांसाठी वेगळी निवडणूक होणार? अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. निवडणुकीच्या संदर्भात अनेकांनी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी योग्य ती दादही मागितली आहे.
राजकीय पक्षातील संभ्रम…
प्रभागरचना किंवा निवडणुकी संदर्भात योग्य ते निर्णय 23 गावांबाबत स्पष्ट नसल्यामुळे अनेकांचे पक्ष बदलाचे तसेच राजकीय घडामोडी संदर्भातील निर्णय जैसे थे आहेत. 23 गावांमधील राजकीय पक्षांचे सत्ता संघर्ष थंडावले आहे. लोकप्रतिनिधी देखील राजकीय स्पर्धेत पठार अवस्थेत विसावले आहेत.
विकास कामांसाठीचा भरीव निधी कधी?
23 गावांमध्ये ग्रामपंचायतचा कार्यभार सुरू होता, तेव्हा सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी विकासकामांचा धडाका लावला होता. पालिकेत गावे समाविष्ट होऊनदेखील पिण्याचे पाणी, सांडपाणी, अंतर्गत रस्ते यांच्याबाबतीत भरीव निधी नसल्याने गावे विकास कामांपासून दूर आहेत. नागरिकांना मिळकतीच्या कराची आकारणी तसेच मनपाच्या हद्दीत अनधिकृत होर्डिंग व इतरवर कारवाई मात्र दिमाखात सुरू आहे.
महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या गावांसाठी पिण्याचे पाणी, अंतर्गत रस्ते, सांडपाणी यासाठी भरीव निधीची गरज आहे. मनपाकडून निधी मिळवण्यासाठी मोठा पाठपुरावा करावा लागत आहे. निवडणुका संपन्न होत नसल्याने विकास कामांना अडथळे येऊ लागले आहेत. याबाबतीत शासनाने लक्ष द्यावे.
-रामभाऊ दाभाडे, माजी सदस्य जिल्हा परिषद पुणे
नागरिकांना कराची आकारणी सुरू झाली आहे. विकास कामांसाठी पुणे मनपाकडून पाहिजे तेवढा निधी उपलब्ध होत नाही. नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे. निवडणुकांच्या बाबतीतदेखील अस्थिरता निर्माण झाली आहे. शासनाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावेत.
-राजेंद्र सातव पाटील, माजी उपसरपंच ग्रामपंचायत वाघोली
मनपा निवडणुकांबाबत निर्माण झालेली अस्थिरता शासनामार्फत लवकरच दूर होईल. त्यासाठी काहींनी न्यायालयात देखील दाद मागितली आहे. विकास कामांच्या बाबतीत राज्य शासनाकडे तसेच पुणे महानगरपालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे.
– संदीप सातव माजी उपसरपंच, वाघोली