Maharashtra Winter Season : राज्यात सध्या डिसेंबरच्या थंडीने सर्वांनाच हुडहुडी भरली आहे. विदर्भ, मराठवाड्यात थंडीचा कडाका वाढला आहे. आज मुंबईतील पारा 19 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. तर नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात 9 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे.
राज्याचे ‘मिनी काश्मिर’म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये पारा 15 अंशावर आला आहे . पर्वतीय भागात बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. मैदानी भागातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील वातावरणावरही परिणाम होत आहे तर मराठवाड्यातील अनेक भागातील तापमानात घट झाली आहे. पुण्यातही गारवा वाढला असून किमान तापमान 11.3 अंशांवर गेले आहे.
मराठवाड्यात अनेक भागातील थंडीची लाट पसरली असून कडाक्याच्या थंडीने गारठले आहे. बीड जिल्ह्याचे तापमान 12 अंशापर्यंत घसरले असल्याने सर्वत्र कमालीचा गारठा निर्माण झाला आहे. ग्रामीण भागासह शहरातही ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत.
डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात थंडीचा कडाका जाणवत नव्हता, त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात तापमानात घट झाली असून थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या तीन दिवसापासून तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली असून तापमान 15 अंश पर्यंत खाली आले आहे. वातावरणातील गारव्याचा फायदा रब्बी हंगामातील पिकांना होणार असून पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे.