पुणे : आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली आहे. पार्थ पवारांनी शंभूराज देसाईंची भेट का घेतली? याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. तसेच काही खासगी कामासाठी ही भेट असल्याचं पार्थ पवार यांनी सांगितलं असलं तरी, या भेटीनंतर सर्वत्र राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. यावरून राज्यात घमासान सुरू झाले आहे.
शंभूराज देसाई आणि पार्थ पवार यांच्यात देसाई यांचा शासकीय बंगला असलेल्या पावनगड येथे 15 ते 20 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. या भेटीचं भाजपा नेते गोपिचंद पडाळकर यांनी कारण दिलं आहे. यावर बोलताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ आहेत म्हणून ते अशा भेटी घेत आहेत. कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना पडळकर यांनी हे भाष्य केलं.
पडळकर पुढे म्हणाले की, “पार्थ पवारांनी मंत्री देसाईंची भेट कशासाठी घेतली हे माहिती नाही. पण, पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ आहेत कारण, त्यांचे बंधू रोहित पवार हे दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन विधानसभा सदस्य झाले. ते आता क्रिकेट असोसिएशनचे देखील अध्यक्ष झाले असून, बारामती अॅग्रो सारखी संस्था ही त्यांच्याकडं आहे. त्यामुळं त्यांच्या मनात खंत असेल.”
“पार्थ पवार यांचा मावळ लोकसभेत अडीच लाखांच्या मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे राजकीय स्थिरता मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत असतील. घरात आजोबांकडून अन्यात होत असल्याने, न्याय मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे,” असा टोला देखील पडळकर यांनी लगावला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीचा मित्र पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात गट) अध्यक्ष सचिन खरात यांनी गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या विधानावरून पडळकर यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
सचिन खरात यांनी म्हटले आहे की, गोपीचंद पडळकर हे आमदार होण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या दारासमोर तासानतास थांबताना दिसत होते. तेच पडळकर पार्थ पवार यांना बोलताना दिसत आहेत. पडळकर यांनी लक्षात घ्यावे की, मंत्री शंभूराजे देसाई हे राज्याचे मंत्री आहेत त्यामुळे कोणीही त्यांची कामानिमित्त भेटू घेऊ शकतं. परंतु गोपीचंद पडळकर यांनी भेटीचा वेगळाच अर्थ घेतला आहे. त्यामुळे त्यांनी ज्योतिषीचा व्यवसाय कधी पासून सुरु केला हे त्यांनी जाहीर करावे.