मुंबई : दावोस जागतिक आर्थिक परिषदेत गुंतवणुकीचे 1 लाख 37 हजार कोटींचे सामंजस्य करार झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच प्रथमच दावोस इथे महाराष्ट्राचे इतक्या मोठ्या संख्येने करार झाल्यामुळे देशी आणि विदेशी गुंतवणूकदारांचा राज्यावर विश्वास असल्याचे दिसते असे सांगून या गुंतवणूकदारांचे प्रकल्प लवकरात लवकर सुरु होतील असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसने निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीने पक्षाच्या फेसबूकच्या अधिकृत पेज वरून निशाणा साधताना म्हटले आहे की, शिंदे-फडणवीस सरकारचा कारभार म्हणजे ‘काखेत कळसा आणि दावोसला वळसा’ होय.
राष्ट्रवादीने पुढे म्हटले आहे की, “राज्यात कोट्यवधींची गुंतवणुक येण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे विश्वासू सहकारी लाखोंचा खर्च करून दावोसला गेले. या दौऱ्यातून राज्याचा फायदा होण्याची अपेक्षा होतीच. दौऱ्यात बडवे इंजीनीअर, महिंद्रा अँड महिंद्रा यासारख्या कंपन्यांशी करार करण्यात आला. या गुंतवणुकीत राज्यातील कंपन्यांशीच करार होणार होते तर ते महाराष्ट्रातच करता आले असते. दावोसच्या तुलनेत खर्चही कमी झाला असता. त्यामुळे काखेत कळसा आणि गावाला वळसा असा कारभार राज्य सरकारने केला हे स्पष्ट होते.
तसेच या दौऱ्यातून आलेली गुंतवणूक ही जमेची बाजू धरली तरी दावोसला जाऊन केलेला करार हा राज्यात करून जनतेचा लाखोंचा पैसा इतर महत्त्वपूर्ण कामांसाठी वापरण्यात आला असता. मात्र एकंदरीत वस्तुस्थिती पाहाता केवळ दिखाव्यासाठी हा दौरा आखण्यात आला असावा, अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्य सरकारने किती परदेशी कंपन्यांशी करार केले हे जाहीर करावे अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.
Maharashtra Politics : पार्थ पवार-शंभूराज देसाईंची भेट; गोपीचंद पडळकरांनी सांगितलं भेटीमागचं कारण
मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरील राष्ट्रवादीच्या या टीकेवर शिंदे- फडणवीस सरकार काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.