मुंबई – राज्यातील पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहे. जून महिन्यात सुरू करण्यात आलेल्या वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि निरीक्षकांच्या पदोन्नती आणि बदली नंतर गृह विभागाने पुन्हा एकदा राज्यातील 449 पोलिस निरीक्षकांच्या बदलांचे आदेश काढले आहेत. या आदेशानुसार राज्य पोलिस दलात कार्यरत असलेल्या 449 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
या पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांमध्ये 336 बदल्या या विनंतीनुसार तर 113 बदल्या या राज्य शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील 28 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना थेट सहाय्यक पोलिस आयुक्त पदी बढती देण्यात आली होती.
तर मुंबई पोलिसातील सहा. सहाय्य पोलिस आयुक्त यांची बदली करण्यात आली होती. मुंबई शहरातील 65 पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या देखील करण्यात आल्या होत्या.
न्यायालयाच्या आदेशाचा भंग नको
या बदली आदेशाची प्रत संबंधित पोलिस अधिकारी यांना तात्काळ बजावण्याच्या आदेश राज्याच्या गृह विभागाने दिले आहे. मात्र, त्यांना तात्काळ कार्यमुक्त करताना न्यायालय अथवा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण यांच्या आदेशाचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. बदली आदेशानुसार जे पोलिस अधिकारी गैरहजर राहतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे देखील आदेशात म्हटले आहे.