“कशाचा पन्हाळा रिघे खानदेशी’ ही म्हण बरेचदा वापरली जाते. ही एक काव्यपंक्ती असून ती महादेव मोरेश्वर कुंटे लिखित “राजा शिवाजी’ या खंडकाव्यातील बहिर्जी नाईक यांच्याबद्दल आहे.
“राजा शिवाजी’ हे ऐतिहासिक खंडकाव्य इंग्रजी साहित्यातील हिरोइक एपिक म्हणजे वीररसप्रधान शैलीमध्ये प्रथम लिहिणारे महादेव कुंटे यांचा आज स्मृतिदिन. अशिक्षित व सुशिक्षित यांना राष्ट्रहितासाठी एकत्र आणले पाहिजे, यासाठी सर्वांना समजेल व आवडेल अशा सरळ व नित्य व्यवहारातील भाषेचा प्रयोग केला पाहिजे, असे त्यांचे मत होते. यावर तत्कालीन संस्कृतनिष्ठ भाषाभिमानी पंडितांनी आदर्श मोडल्यामुळे त्यांच्यावर खूप टीका केली होती. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील माहुली या गावी 1 ऑगस्ट 1835 रोजी झाला. लहानपणीच त्यांचे पितृछत्र हरपले. कोल्हापुरात त्यांनी शिक्षण पूर्ण केले.
पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला गेले. वर्ष 1859 मध्ये विल्सन हायस्कूलमधून मॅट्रिक व एल्फिन्स्टन महाविद्यालयामधून बी.ए. झाले. त्यानंतर मुंबई सरकारच्या शिक्षण खात्यात नोकरीस लागले. त्यांची बदली कराची, पुणे, कोल्हापूर येथे प्रमुख अध्यापक म्हणून झाली. कोल्हापूर येथे त्यांनी जुन्या पद्धतीप्रमाणे संस्कृतचा सखोल व व्यापक अभ्यास केला होता. मुंबई व अहमदाबाद येथील सरकारी महाविद्यालयात काही काळ ते संस्कृतचे प्राध्यापक होते. मराठीशिवाय इंग्रजी, संस्कृत, सिंधी, गुजराथी या भाषांवर प्रभुत्व असल्यामुळे ते त्या भाषांतून अस्खलित भाषण करीत. ग्रीक, पर्शियन व लॅटिन भाषांचेही ते जाणकार होते. “रोमॅंटिक स्टाइल’मध्ये काव्य लिहिणारे त्या काळातील ते एकमेव कवी होते.
शिवाजी महाराज व त्यांचे अनेक साथीदार यांचे विशेष पैलू त्यांनी आपल्या काव्यातून मांडले आहेत. बहिर्जींबद्दल लिहिताना त्यांनी बहिर्जींची नारदमुनींबरोबर तुलना केली आहे. बहिर्जी एखाद्याची माहिती देतांना त्याठिकाणचे वर्णन, व्यक्तीचे गुणदोष त्याची दुखरी “नस’ यांचा अभ्यास करून मग ती राजांकडे पोचती करीत असत. असे महाराजांच्या अनेक शिलेदारांच्या कर्तृत्वाचे त्यांनी वर्णन “राजा शिवाजी’ या खंडकाव्यात केले आहे. पूर्वी शालेय क्रमिक पुस्तकात “बहिर्जी नाईक’ या नावाने कवितेचा समावेश होता. या काव्याचे भाग 1 ते 3 (1869) व भाग 4 ते 6 (1871) प्रसिद्ध झाले. त्यांनी इंग्रजी काव्यरचनाही केल्या होत्या.
व्हिसिसिट्यूड्स ऑफ आर्यन सिव्हिलिझेशन इन इंडिया हा निबंध इटलीच्या विद्वत्त परिषदेने घेतलेल्या स्पर्धेसाठी त्यांनी पाठवला होता. त्यासाठी त्यांना पारितोषिकही मिळाले होते. अन्य वसाहतींप्रमाणे स्थानिक नेत्यांचा प्रभाव पूर्णपणे पुसून टाकणे शिवाजी महाराजांचे बाबत शक्य नाही, हे ब्रिटिशांना 1857 च्या उठावानंतर पटले. त्यामुळे ब्रिटिशांनी लवकरच शिवाजीराजांवर वर्ष 1869 मध्ये महाकाव्य लेखनाची स्पर्धा जाहीर केली. या स्पर्धेत पहिले बक्षीस पुण्याचे गणेशशास्त्री लेले यांच्या संस्कृत महाकाव्याच्या सादर केलेल्या शिवाजी चरित्राला मिळाले होते. त्याच स्पर्धेतील दुसरा क्रमांक कुंटे यांच्या “राजा शिवाजी’ला मिळाला होता. त्याची रचना बोली भाषा, प्रादेशिकता व रयतेच्या लोकसंस्कृतीला महत्त्व देणारी होती. इंग्रजी-मराठीतून लेखन करून त्यांनी प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाचा परिचय करून दिला. पुणे येथे 8 ऑक्टोबर 1888 रोजी त्यांचे निधन झाले.