नवी दिल्ली – माझी बहिण मधुमिता हिच्या मारेकऱ्यांना कारावासातून सोडून, राज्यपालांची दिशाभूल करत, उत्तर प्रदेश सरकारच्या आदेशाने न्यायाची आशा आणि विश्वासाला तडा गेला आहे, अशा शब्दांत मधुमिताच्या बहिणीने, निधी शुक्लाने योगी सरकारविरोधात शरसंधान केले आहे.
कवयित्री मधुमिता शुक्ला हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले माजी मंत्री अमरमणी त्रिपाठी आणि त्यांची पत्नी मधुमणी त्रिपाठी यांची सुटका करण्याचा आदेश सरकारने जारी केला आहे. ही बातमी समजताच त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. मात्र शुक्ला कुटुंबाने हा आदेश म्हणजे न्यायाची पायमल्ली असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर कवयित्री मधुमिता शुक्ला हत्याकांडातील दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला नोटीस बजावली आहे.
निधी शुक्ला यांनी सांगितले की, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले अमरमणी आणि मधुमणी त्रिपाठी हे गोरखपूरच्या बाबा राघवदास मेडिकल कॉलेजमध्ये 2012 पासून सतत खोली क्रमांक 15 आणि 16 मध्ये राहत आहेत. खरे तर हे दोघे उत्तराखंडमधील हरिद्वार कारागृहातील कैदी आहेत. या संदर्भात निधी शुक्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात न्यायालयाचा अवमान याचिका दाखल केली आहे. त्याची सुनावणी 25 ऑगस्ट रोजी होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारला नोटीस बजावली असून आठ आठवड्यांत उत्तर मागितले आहे.
निधी शुक्ला म्हणाल्या की, सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केल्यानंतर, गेल्या 15 दिवसांपासून ते सरकार आणि राज्यपालांना सातत्याने पत्रे आणि मेल पाठवत आहेत, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालय अवमान याचिकेवर निर्णय देत नाही तोपर्यंत कोणतीही कारवाई करू नये. असे असतानाही राज्यपालांच्या आदेशावरून अमरमणी आणि मधुमणी यांची जामिनावर सुटका केली आहे. सत्तेच्या दबावाखाली राज्यपालांची दिशाभूल करून असा आदेश काढण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.