नवी दिल्ली : संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली आयएनएस विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका आज नौदलाच्या सेवेत दाखल झाली आहे. त्यामुळे भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढली आहे. कोची येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. यावेळी “भारतीय सामर्थ्याचं प्रतीक म्हणजे विक्रांत आहे. प्रत्येक भारतीयासाठी आयएनएस विक्रांत म्हणजे स्वाभिमान आहे”, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयएनएस विक्रांतच्या सामर्थ्याचा गौरव केला आहे.
विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका आहे. एकाच वेळी ३० पेक्षा जास्त विविध प्रकारची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर वाहून नेण्याची विक्रांतची क्षमता आहे. विक्रांतचे वजन हे तब्बल ४० हजार टन एवढे असून पूर्ण क्षमतेने कार्यरत असताना हे वजन ४५ हजार टन एवढे असते. एका दमात १५ हजार किलोमीटर एवढा पल्ला गाठण्याची विक्रांतची क्षमता आहे.
#WATCH | Shaping a dream building a nation. Designed by the Indian Navy and constructed by CSL Cochin, a shining beacon of AatmaNirbhar Bharat, IAC #Vikrant is all set to be commissioned into the Indian Navy.
(Source: Indian Navy) pic.twitter.com/LpHADHTlPk
— ANI (@ANI) September 2, 2022
तब्बल १४०० पेक्षा जास्त नौदल सैनिक अधिकारी-कर्मचारी हे विक्रांतवर तैनात राहू शकतात. हवेतील १०० किलोमीटर पर्यंतचे विविध उंचीवरील लक्ष्य भेदणारी बराक-८ ही क्षेपणास्त्रे विक्रांतवर तैनात असणार आहेत. तब्बल २६२ मीटर लांब आणि १४ मजली उंच अशा या स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौकेमुळे नौदलाच्या प्रहार क्षमतेत मोलाची भर पडणार आहे. पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. या युद्धनौकेची रचना स्वदेशी आहे. भारतीय नौदलाच्या स्वतःच्या संस्थेच्या वॉरशिप डिझाइन ब्युरोने युद्धनौका डिझाइन केली आहे. तर बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या कोचीन शिपयार्ड लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील शिपयार्ड कंपनीनं ही युद्धनौका तयार केली आहे.
आयएनएस विक्रांतवर 30 विमाने तैनात असतील. त्यापैकी 20 लढाऊ विमाने आणि 10 हेलिकॉप्टर असतील. सध्या विक्रांतवर मिग-29 के लढाऊ विमाने तैनात केली जातील, अशी माहिती व्हाईस अॅडमिरल घोरमाडे यांनी दिली आहे. त्यानंतर टीईडीबीएफ म्हणजेच दोन इंजिन डेकवर आधारित फायटर जेट डीआरडीओ आणि एचएएलद्वारे तैनात केले जातील. कारण TEDBF पूर्णपणे तयार होण्यासाठी काही वर्षे लागू शकतात.
यादरम्यान अमेरिकेची F-18A सुपर हॉर्नेट किंवा फ्रान्सची राफेल (M) तैनात केली जाऊ शकते. या दोन्ही लढाऊ विमानांच्या चाचण्या सुरू झाल्या असून अंतिम अहवालानंतर कोणती लढाऊ विमाने तैनात करायची, याचा निर्णय घेतला जाणार आहे. घोरमाडे म्हणाले की, यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासून विक्रांतवर मिग-29 लढाऊ विमाने तैनात करण्यास सुरुवात होईल.
व्हाईस अॅडमिरल एसएन घोरमाडे म्हणाले की, 2 सप्टेंबर हा ऐतिहासिक दिवस आहे. 40 हजार टन विमानवाहू युद्धनौका तयार करण्याची क्षमता असलेल्या जगातील सहा निवडक देशांच्या पंक्तीत भारत सामील झाला आहे. उर्वरित पाच देश अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि इंग्लंड आहेत. व्हाईस अॅडमिरलच्या मते, आयएनएस विक्रांतचा भारताच्या युद्ध ताफ्यात समावेश केल्याने इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांतता आणि स्थिरता राखण्यास मदत होईल.