सातारा -सहा तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या किसन वीर कारखान्यासह खंडाळा सहकारी साखर कारखाना वारेमाप कर्जाद्वारे अडचणीत आणण्याचे महापाप माजी आमदार व माजी चेअरमन मदन भोसले यांचेच आहे. मदन भोसले यांनी 575 कोटीच्या कर्जाचा डोंगर उभा केला. पण माणसाकडे किती कोडगेपणा असावा निर्लज्जपणे प्रसारमाध्यमांसमोर आपण आमच्यावर धडधडीत आरोप करत आहात. परंतु, मदन भोसले व त्यांच्या पै पाहुण्यांनी किसन वीर कारखाना खाल्ला, असा आरोप जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष व कारखान्याचे संचालक नितीन पाटील यांनी केला.
नितीन पाटील म्हणाले, “”आमदार मकरंद पाटील व मी आम्ही कारखाना चालवण्यासाठी सक्षम नाही, असा आरोप मदन भोसले यांनी केला आहे. खंडाळा कारखाना आम्ही 17 ऑक्टोबर 2019 रोजी तर किसन वीर सहकारी साखर कारखाना आम्ही 17 मे 2022 रोजी ताब्यात घेतला. हे दोन्ही कारखाने कर्जाच्या बोजामुळे बुडीत अवस्थेत आहेत.
पाच तालुक्यांतील कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आम्ही या निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला. अडीच हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेचा किसन वीर कारखाना आहे. यापेक्षा जास्त क्षमतेचे कारखाने कमी पैशात उभे राहिले. अडीच हजार क्षमतेचा कारखाना 80 कोटीत उभा राहिला पाहिजे. या कारखान्यासाठी पाच हजार रुपये दराने 148 एकर जमीन देण्यात आली.
या कारखान्याच्या उभारणीतच 60 कोटीचा भ्रष्टाचार झाला. मदन भोसले यांनी या कारखान्याच्या नरडीला नखच नाही लावले तर नरडेच खाल्ले. खंडाळा कारखान्याला जन्म होतानाच कुपोषित स्वरूपातच जन्माला घातले आणि त्याचे पाप आमच्या माथी मारले. किसन वीर सहकारी साखर कारखान्यावर अडीचशे कोटीचे कर्ज आहे.
”मदन भोसले यांना गेली सात वर्षे निम्म्या क्षमतेने सुद्धा प्रतिवर्षी उत्पादन घेत आले नाही. कारखाना वाचवण्यासाठी आम्ही पॅनेल टाकले, मुळात आपण आर्थिक चुका करायच्या आणि त्याचे हिशोब आमच्या माथी मारायचे हा प्रकार निश्चितच निंदनीय आहे. हे असे आरोप म्हणजे मदन भोसले यांच्या कोडगेपणाचा अक्षरशः कळस आहे. लिलावाच्या नोटीस दोन वर्षांपूर्वी झाल्या असत्या. खंडाळा कारखान्याचे जी दुर्गती झाली आणि जो कर्जाचा डोंगर उभे राहिला तो मदन भोसले यांनी केलेला उद्योग आहे. मकरंद पाटील यांनी सत्तेत आल्यापासून एक रुपयाचे एक कर्ज घेतले नाही, असे स्पष्ट केले.
दोन्ही कारखान्यांचा हंगाम सुरू करणार
किसन वीर, प्रतापगड व खंडाळा कारखाना या तिन्ही कारखान्यांना 575 कोटींची नऊ ते दहा बॅंकांची कर्जे आहेत. साडेतीनशे कोटी रुपयांची देणी आहेत व सहा कोटी रुपये ऊसाचे बिल द्यावयाचे आहे. ज्यावेळी आम्ही खंडाळा कारखाना ताब्यात घेतला तेव्हा त्या कारखान्याची तिजोरी कडकडीत मोकळी होती. जीएसटीसुद्धा भरला नव्हता. कामगारांचा सहा कोटी रुपयांचा पीएफ सुध्दा भरला नाही. असे सगळे कारनामे आम्ही मदन भोसले यांचे सांगितले तर दोनशे पानांचे पुस्तक सुद्धा व्यवस्थित तयार होईल, असेनितीन पाटील यांनी सांगितले. मदन भोसले आणि त्यांच्या पै पाहुण्यांनी किसन वीर कारखाना पद्धतशीरपणे धुऊन खाल्ला. आम्ही कारखाना वाचविण्यासाठी आमचे राजकीय अस्तित्व पणाला लावले आहे. आम्ही सत्तेसाठी करत नाहीत किसन वीर कारखाना आणि खंडाळा हे दोन्ही कारखाने आर्थिक दुरवस्थेतून आम्ही नक्कीच बाहेर काढू. दोन्ही कारखान्यांचा हंगाम नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा सुरू करण्यात येईल, असा विश्वास नितीन पाटील यांनी व्यक्त केला.