नितीन साळुंखे
नागठाणे – जगभरात प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून 14 फेब्रुवारी हा दिवस “व्हॅलेन्टाईन डे’ म्हणून साजरा केला जातो. भारतातही गेल्या काही वर्षांपासून युवकांमध्ये “व्हॅलेंटाईन डे’चे प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आपल्या प्रिय व्यक्तीजवळ आपल्या प्रेमभावना व्यक्त करताना गिफ्ट दिले जाते. यामध्ये प्रामुख्याने गुलाबांच्या फुलांचा (त्यातही लाल फुलांचा) मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र, यावर्षी झालेली अतिवृष्टी, वातावरण लहरीतील बदल यामुळे गुलाबाच्या उत्पादनात चांगलीच घट झाली असून यावर्षी प्रेमवीरांना आपल्या भावना व्यक्त करणे महाग पडणार आहे.
व्हॅलेनटाइन डे लक्षात घेऊन गुलाबांच्या फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. विविधरंगी फुलांचा नजराणा तयार होतो. यावर्षी मात्र, बदलत्या वातावरणामुळे गुलाबांच्या उत्पादनात 20 ते 25 टक्क्यांनी घट झाली. त्यातच यावर्षीचा उच्चांकी पाऊस आणि महापुराच्या स्थितीमुळे फूल शेतीला मोठा फटका बसला असताना थंडीचे प्रमाण कमी राहिल्याने उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे मुख्य बाजारपेठेत गुलाबांच्या फुलांची आवकही घटली आहे.
यापूर्वी किरकोळ बाजारपेठेत 5 ते 7 रुपयांना मिळणारे गुलाबाचे फुल आज 15 ते 17 रुपयांपर्यंत विकले जात आहे. सध्या व्हॅलेन्टाइनचा फिव्हर असल्यामुळे हेच फुल 20 ते 25 रुपयांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.”व्हॅलेंटाईन डे’ ला प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाच्या फुलांचे महत्व त्यातही लाल गुलाबाचे फुल अनिवार्य असल्याने यावर्षी “व्हॅलेनटाइन डे’ ला गुलाबाचे दर वाढण्याची चिन्हे असून यामुळे प्रेमवीरांना चढ्या दराने प्रेम व्यक्त करावे लागणार आहे.