ऊसतोडीवेळी काटेवाडीत थरारक घटना ः परिसरात बिबट्याची दहशत कायम
भवानीनगर – उसतोड मजूर ऊस तोडत असताना उसाच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या चारीवर बिबट्या अचानक समोर आला. त्यावेळी बिबट्या आणि मजुराने एकमेकांना पाहिले अन् उसतोड मजूर जागीच बेशुद्ध झाला. त्यास तातडीने बारामती येथील खासगी दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
काटेवाडी (ता. बारामती) येथील संजय तुळशीराम काटे यांच्या शेतातील ही चित्त थरारक घटना. येथील स्मशानभूमीच्या पाठीमागे काटे यांच्या शेतात उसाला तोड आल्याने या ठिकाणी ऊस तोडण्यासाठी शेतमजूर पहाटे उसाच्या शेतामध्ये आले. सकाळी सहाच्या सुमारास ऊसतोड मजूर दिलीप राजाराम जगताप व त्यांची पत्नी ऊस तोडत असताना अचानक उसाच्या फडाशेजारी असलेल्या चारीच्या बाजूने बिबट्या आलेला दिलीप राजाराम जगताप आणि त्यांच्या पत्नीने पाहिल्याने दोघेही मोठ्याने ओरडले. यामध्ये भीतीने दिलीप जगताप हे जागीच बेशुद्ध पडले. त्यामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या इतर ऊसतोड मजुरांनी तातडीने काटे यांच्याशी संपर्क साधून गाडीवरून या ऊसतोड मजूरास बारामती येथील खासगी दवाखान्यात दाखल केले.
काटेवाडी, कण्हेरी भागामध्ये बिबट्याची दहशत अजूनही कमी झालेली नसून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना शेतामध्ये जाताना बिबट्याचे दर्शन घडलेले आहे. त्यामुळे या भागातील असलेला बिबट्या वन विभागाच्या माध्यमातून जेरबंद करण्यात आला पाहिजे. अशी मागणी या भागातील शेतकरी करीत आहेत.
शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असलेल्या उसाला पाणी देणे किंवा द्राक्षबागा, डाळिंब बागा या बागांना पहाटे औषध मारावे लागते. या सर्व शेती व्यवसायासाठी शेतकऱ्यांना सध्या शेतात जाणे कठीण झालेले आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे या भागामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु गेल्या पंधरा दिवसापूर्वी या भागातील एक बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यामध्ये अडकला होता. त्यानंतर या भागातील असलेले तीनही पिंजरे यांना वन विभागाच्या माध्यमातून कुलूप लावण्यात आले. वन विभागाने बिबट्याला पकडून पंधरा दिवस होऊन गेले तरीही या पिंजऱ्याचे कुलूप न काढता ते आहे त्याच ठिकाणी कुलूप लावल्याच्या अवस्थेत आहेत.
शेतमजुराने बिबट्याला समोरून आल्याचे पाहिल्याने शेतमजूर बेशुद्ध पडला व याची माहिती बारामती वन विभागाच्या वनक्षेत्र परिमंडळ अधिकारी त्र्यंबक जराड, वनरक्षक मीनाक्षी गुरव आणि पिंपळी नर्सरी वनरक्षक संध्या कांबळे, तसेच वनकर्मचारी दत्तात्रय पाटोळे यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली असता या पाण्याच्या चारीच्या कडेने उसाच्या शेतामध्ये बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. हे ठसे बिबट्याचे असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
निरावागज परिसरात बालिंगा, तीन मेंढ्या ठार
निरावागज (ता. बारामती) परिसरातील पत्रा वस्ती येथील एक बालिंगा आणि तीन मेंढ्या ठार झाल्या आहेत. त्यामुळे या भागामध्ये बिबट्या आल्याचे बोलले जात होते. परंतु वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पायांच्या ठशांची पाहणी केली असता, हा हल्ला बिबट्याचा नसुन लांडग्यांच्या कळपाने केला असावा असा अंदाज वनक्षेत्र परिमंडळ अधिकारी त्र्यंबक जराड यांनी व्यक्त केला आहे. निरावागज येथे जबाजी दत्तात्रय देवकाते यांची पत्रावस्ती या नावाने वस्ती आहे.
या ठिकाणी गोठ्यामध्ये शुक्रवारी (दि. 8) मध्यरात्रीच्या दरम्यान एक बालिंगा आणि दोन मेंढ्या ठार केल्या असल्याचे देवकाते यांनी पाहिले. यावेळी वन विभागाचे वनपरिक्षेत्र मंडळ अधिकारी त्र्यंबक जराड, वनरक्षक मीनाक्षी गुरव, पिंपळी नर्सरी वनरक्षक संध्या कांबळे, वनकर्मचारी दत्तात्रय पाटोळे यांनी याठिकाणी भेट दिली. यावेळी येथे असलेल्या पायांच्या ठशावरून झालेला हल्ला पाहून हा हल्ला बिबट्याने केला नसून लांडग्याच्या कळपाने केला असावा असा अंदाज वनपरिक्षेत्र मंडळ अधिकारी त्र्यंबक जराड यांनी केला आहे.