पुणे – प्रेम विवाहानंतर इगो आणि वैचारिक मतभेदामुळे न्यायालयात वाद पोहोचविलेले उच्चशिक्षित दांपत्य सहा वर्षाच्या मुलीच्या भवितव्याचा विचार करून एकत्र आले आहे. दोघांनी नव्याने संसार सुरू केला आहे. पत्नी आणि पतीने एकामेकाविरोधात न्यायालयात दाखल केलेले दावे माघारी घेतले.
वकिलांनी केलेले समुपदेशन यासाठी महत्त्वाचे ठरले. पत्नीने कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार, तर पतीने घटस्फोट मिळण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला होता. ऍड. प्रणयकुमार लंजिले, ऍड. अनिकेत डांगे आणि ऍड. लक्ष्मण सावंत यांनी समुपदेशासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) दोघेही उच्चशिक्षित आहे. आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. सुरूवातीला ओळख, त्यानंतर दोघात प्रेम निर्माण झाले. यातून मार्च 2007 मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यानंतर संसार सुरू केला. 2016 मध्ये त्यांना मुलगी झाली. त्यानंतर वाद विकोपाला गेल्याने पत्नीने 2018 मध्ये त्याच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे दावा दाखल केला.
तर 2019 मध्ये वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीशांकडे त्याने घटस्फोट मिळण्यासाठी दावा दाखल केला. दरम्यान करोना काळात दोघांच्या भेटी-गाठी झाल्या. एकत्र राहू लागले. चार वर्षांपासून सुरू असलेले वाद कमी झाले. मुलीच्या भवितव्य आणि कल्याणाचा विचार करून दोघांनी न्यायालयातील एकामेकाच्या विरोधतील दावे काढून घेतले.
समुपदेशनात पटवून दिल्यामुळे दोघांनी मुलीचा विचार करून इगो, वाद-विवाद बाजूला ठेवले. एकत्र येण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे वाद सुरू असलेल्या दांपत्यांनी यातून शिकवण घ्यावी. मुले, स्वत:च्या भवितव्य आणि कल्याणाचा विचार करून एकत्र यावे.
ऍड. प्रणयकुमार लंजिले, अर्जदारांचे वकील.