अमरावती : नुपूर शर्मा समर्थनार्थ पोस्ट टाकणाऱ्या केमिस्ट हत्या प्रकरणात थेट गृहमंत्री शहांनी घातले लक्ष; केली मोठी घोषणा

अमरावती – येथे एका केमिस्टची गळा चिरून जी हत्या करण्यात आली आहे त्या प्रकरणाचा तपासही एनआयएकडे सोपवण्यात आल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. या आधी उदयपुर येथेही जी घटना घडली आहे त्याचाही तपास एनआयएकडेच देण्यात आला आहे.
हे प्रकरण एनआयए कडे चौकशीसाठी सोपवावे अशी मागणी भाजपनेच केली होती असे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रात 21 जुनला अमरावतीत घडलेल्या या घटनेची अन्यत्र फारशी वाच्यता झाली नव्हती. तसेच तेथील पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात पाच आरोपींना अटकही केली आहे.
तथापि या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार मात्र अजून फरारी आहे. त्याचा शोध जारी आहे. आता एनआयए यात सहभागी झाल्याने यात सहभागी असलेल्या अन्य लोकांपर्यंतही ही यंत्रणा पोहचू शकणार आहे.
नेमकं काय घडलं?
महाराष्ट्रातील अमरावती शहरात एका 54 वर्षीय केमिस्टची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. उमेश कोल्हे असे यात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी भाजपच्या वादग्रस्त निलंबीत प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे समर्थन करणारी पोस्ट सोशल मिडीयावर टाकली होती त्यामुळेच त्यांची हत्या झाली असल्याचा आरोप आहे. ही घटना उदयपुर घटनेशी मिळती जुळती आहे. तेथेही एका शिंपी व्यावसायिकाची याच कारणाने हत्या झाली आहे.
21 जून रोजी केमिस्ट उमेश प्रल्हादराव कोल्हे यांची हत्या झाली होती आणि या संदर्भात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
कोल्हे हे अमरावती शहरात एक मेडिकल स्टोअर चालवत होते. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ त्यांनी काही व्हॉट्सऍप ग्रुपवर पोस्ट शेअर केल्याचा आरोप आहे. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ त्यांनी ती पोस्ट चुकून एका व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये शेअर केली होती ज्यामध्ये काही मुस्लिमही सदस्य होते, त्यात त्यांच्या ग्राहकांचाही समावेश होता असे सिटी कोतवाली पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले.
त्यानंतर इरफान खान नावाच्या व्यक्तिने कोल्हे यांना संपवण्याचा कट रचला आणि त्यासाठी त्याने पाच जणांना तयार केले. त्यांना 10,000 रुपये आणि कारमधून सुरक्षितपणे पळून जाण्याचे आश्वासन दिले, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.





