नागपूर – महाराष्ट्रातील अमरावती शहरात एका 54 वर्षीय केमिस्टची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. उमेश कोल्हे असे यात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी भाजपच्या वादग्रस्त निलंबीत प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे समर्थन करणारी पोस्ट सोशल मिडीयावर टाकली होती त्यामुळेच त्यांची हत्या झाली असल्याचा आरोप आहे. ही घटना उदयपुर घटनेशी मिळती जुळती आहे. तेथेही एका शिंपी व्यावसायिकाची याच कारणाने हत्या झाली आहे.
21 जून रोजी केमिस्ट उमेश प्रल्हादराव कोल्हे यांची हत्या झाली होती आणि या संदर्भात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
कोल्हे हे अमरावती शहरात एक मेडिकल स्टोअर चालवत होते. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ त्यांनी काही व्हॉट्सऍप ग्रुपवर पोस्ट शेअर केल्याचा आरोप आहे. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ त्यांनी ती पोस्ट चुकून एका व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये शेअर केली होती ज्यामध्ये काही मुस्लिमही सदस्य होते, त्यात त्यांच्या ग्राहकांचाही समावेश होता असे सिटी कोतवाली पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले.त्यानंतर इरफान खान नावाच्या व्यक्तिने कोल्हे यांना संपवण्याचा कट रचला आणि त्यासाठी त्याने पाच जणांना तयार केले. त्यांना 10,000 रुपये आणि कारमधून सुरक्षितपणे पळून जाण्याचे आश्वासन दिले, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
उदयपुर हत्या प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी भाजप कार्यकर्ता असल्याच्या दाव्याने एकच खळबळ
ही घटना 21 जून रोजी रात्री 10 ते 10.30 च्या दरम्यान घडली, कोल्हे हे दुकान बंद करून दुचाकीने घरी जात असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. त्यावेळी त्यांचा मुलगा संकेत (27) आणि पत्नी वैष्णवी हे त्यांच्यासोबत वेगळ्या वाहनाने जात होते.हे सर्वजण महिला कॉलेजच्या गेटजवळ पोहोचले असता, मागून दोन मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी कोल्हे यांचा रस्ता अडवला.
त्यातील एकाने कोल्हे यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून तेथून पलायन केले. कोल्हे हे तेथेच खाली कोसळले. संकेतने त्यांना तातडीने रुग्णालयात नेले पण त्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आहे त्यांची नावे मुद्दसीर अहमद , शाहरुख पठाण , अब्दुल तौफिक, शोएब खान, आणि अतीब रशीद अशी आहेत. हे सर्व जण अमरावती शहरातच राहणारे आहेत.