सातारा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम केले आहे. अनेक अडचणींचा सामना करत राज्यात पक्षाची ताकद वाढवली आहे. अजित पवार यांनीही पक्षवाढीसाठी चांगले काम केले आहे. आमचे अजित पवारांवरही प्रेम आहे. मात्र, त्यांनी भाजपला साथ दिली असल्याने आम्ही त्यांच्याबरोबर जाऊ शकत नाही. या संकटात आम्ही शरद पवार यांच्याबरोबरच राहवे असे आमचे अंतर्मन सांगत असल्याने आम्ही तशी भूमिका घेत आहोत, अशी भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी मंगळवारी जाहीर केली.
अजित पवार यांनी समर्थकांसह शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरु आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सातारा जिल्ह्याचा दौरा केला. कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस अभिवादन केल्यानंतर सातारा येथील कार्यक्रमांना श्री. पवार यांनी उपस्थिती लावली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. मात्र, यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांची अनुपस्थिती होती.
याबाबत त्यांची भूमिका जाहीर न झाल्याने सुनील माने त्यांच्याविषयी चर्चा सुरु होती. मंगळवारी दुपारपासून सुनील माने राष्ट्रवादी कार्यालयात तळ ठोकून होते. जिल्ह्यातील सर्व घडामोडींची त्यांनी माहिती घेतली. त्यानंतर सायंकाळी प्रसारमाध्यमांकडे श्री. माने यांनी आपली भूमिका जाहीर केली. मी सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून नसल्याने शरद पवार यांच्या दौऱ्यात सहभागी झालो नव्हता, याबाबत मी वरिष्ठांना कल्पना दिली होती. सोमवारच्या दौऱ्यासाठी रहिमतपूर परिसरातून वाहनांची व्यवस्था करुन अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते कराड व सातारा येथे पाठवले होते. मात्र, माझ्या घरगुती अडचणीमुळे मी या दौऱ्यात सहभागी झालो नव्हतो. त्यामुळे अनेक वावड्या उठल्या. त्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे सुनील माने यांनी सांगितले.