शेतकऱ्यांची पंचनामे करण्याची मागणी
मंचर- भीमाशंकर परिसरातील निगडाळे, कोंढवळ, राजपूर आदी ठिकाणी अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे काढणीस आलेला गहू, हरभरा, टोमॅटो, कोबी, कांदा, बटाटा, वांगी आदी रब्बी पिके भुईसपाट झाली असून, हिरडा झाडांचे नुकसान होऊन आंब्यांचा मोहर गळून पडला आहे. याबाबत महसूल विभागाने पंचनामे करावेत, अशी मागणी आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सभापती संजय गवारी यांनी केली आहे.
भीमाशंकर खोऱ्यात असलेल्या अतिदुर्गम भागामुळे याठिकाणी शेतजमिनीतून भात या पिकाव्यातिरिक्त इतर रब्बी पिकांची शेती करणे खूप अवघड आहे. या कठीण परिस्थितीवर मात करून निगडाळे येथील शेतकरी शांताराम लोहकरे आणि कांताराम लोहकरे यांनी विहीर खोदाई, तसेच शेततळे तयार करून यशस्वी सेंद्रिय शेतीचा प्रयोग केला आहे. अचानक पाऊस व गारपिटीमुळे येथील शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. या पावसात मळ्यात उघड्यावर असलेला बटाटा व कांदा भिजून खराब झाला. प्रामुख्याने गहू, हरभरा, मिरच्या, लसूण, कलिंगड, कोबी, वांगी, टोमॅटो, झेंडू, गुलाब, स्ट्रॉबेरी या पिकांचे नुकसान झाले आहे.
लिंबाच्या आकाराच्या गारांच्या माऱ्यामुळे घरांचे काही ठिकाणी नुकसान झाले, तर शेतातील पिके जमीनदोस्त झाली आहेत.विहीरही या पावसाने गाडली गेली आहे त्यामुळे शेती कशी करावी, असा प्रश्न पडला आहे.
करोना विषाणूमुळे आदिवासी भागातील नागरिकांना भाजीपाला मिळणे अवघड असताना शेतकरी शांताराम लोहकरे यांनी आपल्या शेतातील मिरच्या, बटाटे,वांगी, कांदा आदी फळभाज्या व पालेभाज्या भीमाशंकर, निगडाळे, कोंढवळ, म्हतारबाची वाडी, राजपूर आदी गावांतील सर्वसामान्य नागरिकांना ना नफा ना तोटा या तत्त्वावर उपलब्ध करून दिला होता; पण वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, येथील नागरिकांना स्वस्तात मिळणारा भाजीपाला मिळेनासा झाला आहे.
अवकाळी पावसाचा शेतीतील पिकांना मोठा फटका बसला आहे, त्यामुळे आधीच कर्जाच्या बोजाखाली असलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पिकांच्या नुकसानीचे कृषी विभागाने तातडीने पंचनामे करण्याची मागणी आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सभापती संजय गवारी यांच्यासह शेतकऱ्यांनी आणि हिरडा उत्पादकांनी केली आहे.