सोरतापवाडी -लॉकडाऊनमुळे शेतीतील माल अत्यावश्यक सेवा असताना देखील शेतकऱ्यांचे प्रचंड हाल व नुकसान झाले आहे. शेतकरी आता देशोधडीला लागला आहे. अत्यावश्यक सेवा सुरू असताना रस्त्यावर भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांवर अनेक नियम लादले आहेत.
आता महसुलच्या नावाखाली तळीरामांना सेवापुरविणाऱ्या देशी- विदेशी दारू विक्री दुकानांची तळी उचलली जात आहेत. शेतीमाल विकण्यासाठी पोलिसांचा लाठीमार सहन करावा लागत आहे. या जाचक नियमांमुळे शेतीमाल विक्री करता येत नाही. त्यामुळे लाखमोलाचा शेतीमाल सडून जाण्याच्या मार्गावर आहे.
अल्पभूधारक शेतकरी आहेत. ते कसेतरी थोडेथोडे शेतीमालाची विक्री करीत आहेत. पण मोठ्या शेतकऱ्यांना शेतीमाल व्यापारी व ग्राहक नसल्यामुळे सडून जाण्याच्या मार्गावर आहे. त्यातच बाजारभाव कमी मिळत आहे.
लुटीचा सिलसिला कायम
कोथिंबीर जुडी पाच रुपयांना शेतकरी देत आहेत. हीच जुडी पुढे तीस रुपयांना विकत आहेत. टोमॅटोचा क्रेट 200 रुपयांना मिळत आहे. ग्राहकांना प्रति किलो 40 ते 50 रुपये किलोने विक्री करीत आहेत. शेतकऱ्यांना फक्त 10 ते 15 रुपये किलो मिळत आहे. व्यापाऱ्यांकडून कांदा प्रति किलो 30 ते 40 रुपयांनी विक्री केली जात आहे. शेतकऱ्यांच्या पदरात फक्त 12 ते 13 रुपये पडत आहेत. सोरतापवाडी, उरुळी काचंन नायगाव, पेठ व इतर गावातून दररोज पुणे, मुंबईला सुमारे 100 छोटे, मोठे टेम्पो जात होते. मात्र, लॉकडाऊनमुळे वाहतूक कमी झाली आहे. फक्त दहा ते बारा टेम्पो मुंबईच्या मार्केटमध्ये जात आहेत.