सोरतापवाडी – पूर्व हवेली तालुक्यातील उरुळी कांचन ही मोठी बाजारपेठ आहे. हवेली, पुरंदर, दौंड या तालुक्यांतील गावांतून या बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहक येतात. बाजारपेठेत सुमारे पाचशे दुकाने आहेत. दररोज पाच ते सहा कोटींची उलाढाल होते. मात्र, लॉकडाऊनच्या दीड महिन्यांच्या कालावधीत सुमारे 300 कोटींची उलाढाल पाण्यात गेली आहे. त्यामुळे शेकडो कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.
पुणे- सोलापूर महामार्गावर एक गजबजलेली हवेलीतील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून उरुळी कांचनचे नाव घेतले जाते. हवेली, पुरंदर व दौंड तालुक्यांतील 38 गावांचे नागरिक बाजारपेठेत खरेदीसाठी रोज येतात. दररोज 5 ते 6 कोटींची उलाढाल होत आहे. पण करोनाच्या विळख्यात संपूर्ण बाजारपेठच ठप्प झाली आहे. आर्थिक व्यवहार संथ झाली आहे. त्यामुळे बाजारपेठेवर चालणारे अर्थकारण कोलमडून पडले आहे.
दीड महिन्यांतील सण, उत्सव, विवाह कार्य आदींची याच महिन्यांत रेलचेल होती. मात्र, वर्षभराची पुंजी जमविण्याच्या नादात लॉकडाऊनने पाणी फिरविले आहे. उरुळीच्या बाजारपेठेची घडी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. बाजारपेठेत सरासरी 500 दुकाने आहेत. यात तीन कामगार गृहीत धरल्यास 1 हजार 500 कामगारांना रोजीरोटी मिळत आहे. मात्र, वर्षभराची गुंतवणूक, बॅंकांची कर्जे, व्याज, भागभांडवल, मजुरांचे वेतन आदींची जुळवाजुळव करताना व्यापाऱ्यांची दमछाक होणार आहे.
व्यापाऱ्यांची वर्षभराची पुंजी कर्जात
उरुळी कांचनमध्ये किराणा दुकाने 150, सोन्याची दुकाने 28, फर्निचर मॉल 2 व छोटी- मोठी 20 फर्निचरची दुकाने, कापड दुकाने 45, इलेक्ट्रॉनिक दुकाने 50 व मॉल 2,स्टेशनरी व कटलरी 70, कटींग 50 दुकाने, टेलरिंग 40 दुकाने, शेती पूरक 8 दुकाने, मेडिकल 20 दुकाने, दूध डेअरी 10, शेतीपंप 15 दुकाने, मंगल कार्यालय 3, हॉटेल व ढाबे 17, गावातील लहान- मोठी 20 हॉटेल, बॅंका व पतसंस्था 26 आहेत. सुमारे 500 दुकाने आहेत. यातून दररोज साधारण पाच ते सहा कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.
बाजारपेठेत फर्निचर व कापडाची उलाढाल सर्वात मोठी आहे. त्यापाठोपाठ सोन्याची बाजारपेठ येते. आता लग्नसराईचा हंगाम करोनाच्या लॉकडाऊनमध्ये धुऊन गेला आहे. सोने, चांदीच्या दुकानदारांचे जवळजवळ वीस ते पंचवीस कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. दीडशे कामगार व सेल्समन आहेत. त्यांना महिन्याचा पगार दिला आहे.
– जे. बी. सराफ, अध्यक्ष, सराफ संघटना, उरुळी कांचन.
उरूळी कांचन बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल दररोज होत आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाने दिलासा देण्याची आवश्यकता आहे.
– संतोष हरिभाऊ कांचन, व्यापारी, उरूळी कांचन.