प्रतिबंधित नसलेल्या क्षेत्रात सर्व व्यवहार सुरू राहणार
पुणे – लॉकडाऊन कालावधी वाढणार असल्याचे संकेत महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत. मात्र, प्रतिबंधित नसलेल्या क्षेत्रात सर्व व्यवहार सुरू राहणार असल्याचेही स्पष्ट केले.
31 मेपर्यंत लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपणार असला तरी रोजच्या रोज वाढत असलेली रुग्णांची संख्या पाहता पाचवा टप्पा करावाच लागणार आहे. मात्र, सध्या सुरू असलेले व्यवहार बंद न करता हे नियोजन करावे लागणार आहे.
पुण्यातील बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे केंद्रात किंवा राज्यातील लॉकडाऊन उठला तरी पुण्यासह काही शहरांमध्ये तो राहणार आहेच. परंतु, ज्या ठिकाणी बाधितांची संख्या जास्त आहे, तेथील क्षेत्र मात्र प्रतिबंधित करण्यात येणार आहे. अन्य प्रतिबंधित नसलेल्या क्षेत्रात मात्र ज्या व्यवहारांना परवानगी दिली आहे, ते सुरूच ठेवण्यात येणार आहेत.
पुढील लॉकडाऊनची तयारी महापालिकेने केली आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेला भाग हा अजूनही प्रतिबंधित क्षेत्र आहे. तो वगळता शहराच्या अन्य भागांतही बाधित सापडत आहेत. जनता वसाहत, तळजाईपर्यंतचा भाग आहे. शिवाय, नारायण पेठेतही बाधित सापडले आहेत. त्यामुळे बाधित सापडतील तो भाग लगेचच प्रतिबंधित करण्यात येईल.
क्वारंटाइनची गरज असणाऱ्या रुग्णांसाठी क्वारंटाइन सेंटर्स वाढवली आहेतच, परंतु रुग्णसंख्या वाढली तर आणखी सेंटर्स उभे करण्याची तयारी महापालिकेने पाचव्या टप्प्यात केली आहे. ज्यामध्ये सौम्य स्वरूपात लक्षणे आढळली आहेत, त्यांना घरीच क्वारंटाइन होण्याच्या आणि महापालिका डॉक्टरांशी संपर्कात राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
लॉकडाऊन कालावधी 31 मे रोजी संपणार आहे तर महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्याबाबत अद्याप केंद्र किंवा राज्याकडून निर्देश आलेले नाहीत. मात्र, लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू होण्याची शक्यता असल्याने कर्मचारी उपस्थितीचा निर्णयही त्यानंतरच होईल.
– शेखर गायकवाड, आयुक्त, पुणे महापालिका