राजगुरूनगर -करोना विषाणूचा समूह संसर्ग टाळण्यासाठी राजगुरूनगर शहरात गुरुवार, दि. 2 ते 4 मार्च हे तीन दिवस पूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार आहे. नागरिकांनी घरीच थांबावे कोणीही बाहेर पडू नये, आवश्यक सर्व सेवा सुविधा घरपोच देण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी दिली.
करोनामुळे खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात या दृष्टीने नगराध्यक्ष मांदळे यांनी बुधवारी (दि. 1) नगरपरिषदेत सर्व विभागाचे अधिकारी व शहरातील अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या व्यावसायिक संघटनेचे पदाधिकारी यांची विशेष बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मांदळे यांनी पुढील तीन दिवस शहरात पूर्णपणे लॉकडाऊन व त्यानंतर होम डिलिव्हरीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची घोषणा केली.
या बैठकीला विभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, नगरसेवक बापू थिगळे, ऍड. सुरेश कौदरे, रेखाताई श्रोत्रीय, सचिन मधवे, संपदा सांडभोर, मनोहर सांडभोर, रफीक मोमीन, नीलेश घुमटकर, संदीप सांडभोर, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विलास काजळे, डॉ. प्रदीप शेवाळे, व्यापारी असोसिएशनचे मिलिंद आहेर, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, राजेंद्र जाधव, राहुल आढारी यांसह नागरिक या बैठकीला उपस्थित होते.
मांदळे म्हणाले, संपूर्ण लॉकडाऊनच्या या तीन दिवसांत नागरिकांनी घरीच थांबावे. कोणीही बाहेर पडू नये .आवश्यक सर्व सेवा सुविधा घरपोच देण्यात येणार. तीन दिवसांच्या लॉकडाऊन नंतर शहरात आरोग्य उपचार व मेडिकल वगळता अत्यावश्यक सेवा व्यावसायिकांनी दुकान उघडे न ठेवता आपापल्या क्षेत्रात होम डिलिव्हरी कराव्यात.
बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे शहरातील किराणा दुकानदार दुकान बंद ठेवून होम डिलिव्हरी देणार आहेत. त्यांच्या डिलिव्हरी व्यक्तीना महसूल विभागाच्या वतीने ओळखपत्र देण्यात येणार आहेत. भाजीपाला विक्रीसाठी नगरपरिषदेच्या नऊ वॉर्डमध्ये 9 वाहनांचा वावर राहणार आहे.
दूध विक्री दुकानात न करता होम डिलिव्हरी सुरू राहणार.
खासगी सेवा देणाऱ्या दवाखान्यात डॉक्टर आणि मेडिकल दुकानदार यांनी आपली सेवा 24 तास उपलब्ध करण्याचे सांगितले. तसेच मेडिकल दुकानदारांनी सुद्धा होम डिलिव्हरीवर भर द्यावा, असा सल्ला यावेळी देण्यात आला. शहराच्या सीमा बंद राहतीलच शिवाय शहरातील अंतर्गत रस्तेही पूर्णतः बंद केले जाणार आहेत.
समाज आणि देशासाठी प्रत्येकाने काम करा. नागरिकांनी घरपोच वस्तू मागवा, घरपोच वस्तू देण्यासाठी सर्व व्यवस्था केली आहे. सर्वांना सोशल डिस्टन्स ठेवण्याची सक्ती करावी. कोणीही घराबाहेर पडू नका.
– गजानन टोम्पे, विभागीय पोलीस अधिकारी