हिमांशू
खूप वाईट वाटतं ना? हक्कानं थापा मारण्याच्या दिवशी खरं बोलावं लागतंय. सुग्रास भोजनाचा दरवळ पसरावा, कडकडून भूक लागावी आणि आज उपवास असल्याचं स्मरण व्हावं, अशीच अवस्था झालीय. खरं तर किती मजेचा दिवस! पण ही मजा आपणच आपल्या हातानं घालवून टाकली. महिला दिन, मातृदिन, पितृदिन, कन्यादिन, पर्यावरणदिन, रंगभूमी दिन याबरोबर हल्ली आपण प्रेमाचा दिवस, गुलाबाचा दिवस, चॉकलेटचा दिवस असे असंख्य दिवस साजरे करू लागलो आहोत. त्या-त्या दिवशी त्या-त्या घटकाला प्रचंड महत्त्व दिलं जातं आणि पुन्हा वर्षभर त्या घटकाकडे साफ कानाडोळा केला जातो. खरं तर महिला दिन, पर्यावरणदिन वगैरे दिवस रोजच साजरे व्हायला हवेत, आईला केवळ मातृदिनी नव्हे तर रोजच मान द्यायला हवा, असं अनेकजण म्हणतात. पण तो केवळ फळ्यावर लिहिण्याचा सुविचारच ठरतो.
सन्मान, मानमरातब, आस्था, जबाबदारी वगैरे ज्या काही भावना असतात, त्या एकाच दिवशी उरकून टाकण्याची आपली मानसिकता असते. आजचा दिवस मात्र त्याला अपवाद! हा दिवस वर्षभर साजरा होतो. जवळजवळ दररोज. सत्य आणि असत्य यातील सीमारेषा अत्यंत धूसर होण्याइतपत आपण वातावरण बिघडवून टाकलंय. व्यवस्था आणि तंत्रज्ञानाकडून आपल्याला त्यासाठी मोठ्या प्रमाणावर”शस्त्रपुरवठा’ होतोय. समजलेली माहिती न तपासता अधीरपणे दुसऱ्याला सांगण्याइतके आपण मुळातच “फूल’ बनलो आहोत.
वर्षभरासाठी “फूल’ बनलेल्यांनी “एप्रिल फूल’ साजरं करणं ही या दिवसाचीच चेष्टा ठरेल. खूप आवडणारी व्यक्ती, वस्तू किंवा परिस्थिती दूर गेल्याशिवाय आपल्याला तिची किंमत कळत नाही, असं म्हणतात. आजच्या दिवसाच्या बाबतीत असाच विचार करण्याची संधी यावर्षी आपल्याला परिस्थितीनं दिलीय. चेष्टा म्हणून केलेल्या खोटारडेपणालासुद्धा विशिष्ट चव असते; पण “लांडगा आला रे आला’ या गोष्टीसारखी आपण ती घालवली आणि लाकूडतोड्याची गोष्ट मात्र साफ विसरलो. एप्रिलमध्ये आणीबाणी लागू होणार अशी अफवा पसरणं आणि खुद्द लष्कराला स्पष्टीकरण द्यावं लागणं, या घटना मार्चमध्येच घडून गेल्या असतील तर “एप्रिल फूल’चा रंग नि गंध उडणारच ना? समाजकंटकांनी पसरवलेल्या गैरसमजुतीमुळे यंदाच्या मार्च महिन्यात जगभरात बरेच अनर्थ घडले. कुठे लहानग्या मुलांना मिथेनॉल पाजलं गेलं तर कुठे कामगारांना केमिकलची आंघोळ घातली गेली. अशा स्थितीत “एप्रिल फूल’ कुलूपबंद होणारच ना? खरं तर या दिवसाच्या इतिहासातल्या आठवणी किती रंजक आहेत! कुठल्याशा राजकुमारानं आपल्या वाड्.निश्चयाची तारीख “32 मार्च’ अशी जाहीर करणं, कुठल्याशा वर्तमानपत्रानं “आजचा अंक सीएफसी-11 सारख्या नव्या वायूंच्या उत्सर्जनामुळे ओझोनच्या थराला धोका निर्माण झाल्याचे दिसत असेल, तर अजून काम संपलेले नाही, एवढेच जगाने लक्षात घेतले पाहिजे आणि ओझोनला धोका निर्माण करणाऱ्या प्रत्येक रसायनाचा वापर तातडीने थांबवायला पाहिजे.ळे घालवली आपण!
आज आपण बंधमुक्त आहोत. बोलण्याचं, लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे आपल्याला. आपलं म्हणणं क्षणार्धात इतरांपर्यंत पोहोचवणारं तंत्रज्ञान आपल्याकडे आहे. पटलेल्या विचारांचा प्रसार आपण वेगानं करतो आहोत. आजमितीस घरात बंदिस्त आहोत हे खरं; पण एक व्हिडिओ कॉल केला, तरी दूरवरची प्रियव्यक्ती आपल्यासमोर हजर होतेय. “एप्रिल फूल’ची संकल्पना आली, तेव्हा यातलं काहीच नव्हतं. म्हणूनच हा खेळ जबाबदारीनं खेळण्याची, निखळ मजा अनुभवण्याची प्रवृत्ती होती. कदाचित त्याच काळासाठी होता हा दिवस!