प्राणांतिक अपघाताचे प्रमाण घटलेः पहिल्या सहा महिन्यांत 120 गुन्हे दाखल
पिंपरी – ‘लॉकडाऊन’मध्ये सर्वसामान्यांचे प्रचंड हाल झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या. परंतु “लॉकडाऊन’चे काही सकारात्मक परिणामही दिसून आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पर्यावरणाचा ऱ्हास कमी झाल्याचे दिसून आले आहे. त्याशिवाय शहरात “लॉकडाऊन’मुळे अनेकांचे प्राणही वाचले आहेत. रस्यावरील वर्दळ कमी झाल्याने अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. तसेच अपघातात जीव गमाविणाऱ्यांच्या संख्येतही लक्षणीय घट झाली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात दरवर्षी अपघाताचे प्रमाण वाढते आहे. मात्र यंदा प्रथमच पहिल्या सहामाहीमध्ये प्राणांतिक अपघाताचे गुन्हे तब्बल 46 ने घटल्याचे दिसून आले आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीतून मुंबई-बेंगलोर, पुणे-मुंबई तसेच पुणे-नाशिक हे तीन महामार्ग जातात. तसेच शहरातील अंतर्गत रस्तेही प्रशस्त असल्यामुळे येथील वाहनांचा वेग नेहमी जास्त असतो. शहरातील अपघातांची संख्याही दरवर्षी वाढत असते. मात्र यंदा ते अपवाद ठरले आहे. दिवसेंदिवस करोनाचा प्रसार वाढत चालला आहे. यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. ही जरी चिंतेची बाब असली तरी दुसरीकडे मात्र दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या प्रथम सहामाहीमध्ये प्राणांतिक अपघातांचे गुन्हे तब्बल 46 ने घटले आहे.
“अनलॉक’सोबतच वाढले अपघात
एप्रिल महिन्यात अपघाताचे प्रमाण खूपच कमी होते. मे महिन्याच्या मध्यानंतर हळू हळू परिस्थिती पूर्ववत होऊ लागली आणि रस्त्यावरील अपघातही वाढू लागले. यंदाच्या वर्षी मे महिन्यामध्ये “हिट ऍण्ड रन’चे 14 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी सात गुन्हे उघडकीस आले आहेत. तर जून महिन्यामध्ये 17 प्राणांतिक अपघाताचे गुन्हे दाखल असून त्यापैकी दहा गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश
आले आहे.
120 पैकी 84 गुन्ह्यांची उकल
गेल्या वर्षी 1 जानेवारी ते 30 जून 2019 या कालावधीत तब्बल 166 प्राणांतिक अपघातांचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 131 गुन्हे उघडकीस आले होते. तर यंदाच्या वर्षी याच कालावधीमध्ये 120 गुन्हे दाखल असून त्यापैकी 84 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस यशस्वी ठरले आहेत. तर 36 गुन्ह्यांची उकल करण्यात अद्याप पर्यंत पोलिसांना यश आले नाही.