कोल्हापूर (प्रतिनिधी) – 14 एप्रिलला देशातील लॉकडाऊन संपल्यानंतर महानगरं आणि काही बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागाला त्यातून वगळण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. दरम्यान, मुंबई, पुणे यासारखे बाधित भाग सोडले तर महाराष्ट्रात इतरत्र लॉकडाउनचे निर्बंध 14 एप्रिलनंतर उठवण्यात यावेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
राजू शेट्टी म्हणाले, सध्या लॉकडाऊनचा विपरीत परिणाम शेतकऱ्यांवर होतो आहे. द्राक्षं, आंबे, पपई, भाजीपाला आणि दूध हे बाजारपेठांपर्यंत न पोहचवता आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी आणि ग्राहक यांच्यातली साखळी अबाधित असल्याचा दावा सरकारने केला असला तरीही ते आणि वास्तव हे वेगळं आहे, असेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
ग्रामीण भागात 14 एप्रिलनंतर सरकारने टाळेबंदी उठवावी अशी आमची मागणी आहे. कारण खेड्यांमध्ये करोनाचा फार प्रसार झालेला नाही. गावाकडची माणसं जी मुंबई आणि पुण्यात वास्तव्य करत होती ती ज्यावेळी आपल्या गावी परतली तेव्हा त्यांना सक्तीचे क्वारंटाइन ठेवण्यात आले आहे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.