नवी दिल्ली -केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सोमवारपर्यंत देशात 109 करोनाबाधित मृत्युमुखी पडले. त्यामध्ये पुरूषांचे प्रमाण 73 टक्के तर महिलांचे प्रमाण 27 टक्के इतके आहे.
आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव आगरवाल यांनी पत्रकार परिषदेत संबंधित माहिती दिली. देशातील करोनाबाधितांच्या संख्येत रविवारपासून 693 इतकी वाढ झाली. त्यामुळे ती संख्या 4 हजार 67 वर पोहचली. त्या बाधितांपैकी 1 हजार 445 जण दिल्लीतील तबलिगी जमातच्या समारंभाशी संबंधित आहेत.
देशभरात मृत्युमुखी पडलेल्या करोनाबाधितांपैकी 63 टक्के रूग्ण वयाची साठी ओलांडलेले होते. 40 ते 60 वर्षे वयोगटातील 30 टक्के रुग्ण करोना संसर्गामुळे दगावले. तर 40 वर्षांपेक्षा कमी वय असणारे 7 टक्के रुग्ण करोनाचे बळी ठरले. दरम्यान, तबलिगीचे सदस्य आणि त्यांच्या संपर्कात आलेले असे मिळून देशभरातील 25 हजार 500 हून अधिक जणांचे देशभरात विलगीकरण करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली.
तबलिगींच्या समारंभानंतर देशातील करोनाबाधितांच्या संख्येत अचानकपणे वाढ झाल्याचे आढळले. त्यानंतर तबलिगी सदस्यांना शोधण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी व्यापक मोहीम हाती घेतली आहे.