उपनगरांत विक्रीच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने डेअरीला तोटा; ग्राहकांनाही फटका
– धिरेंद्र गायकवाड
कात्रज – करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने दि.3 मे पर्यंत राज्यामध्ये लॉकडाऊन जाहीर केले आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये दि. 20 एप्रिल ते 27 एप्रिल या कालावधीमध्ये पूर्णपणे संचारबंदी करण्यात आली असली तरी यामधून दूध व्यावसाय वगळण्यात आला असला तरी विक्रीसाठी शासनाकडून निश्चित वेळा ठरवून देण्यात आलेल्या नसल्याने अडचणीत आलेल्या दूध व्यावसायात शासनाकडून मिठाचा खडा टाकण्याचे काम झाले असल्याची भावना दूध उत्पादकांत निर्माण झाली आहे.
लॉकडाऊनच्या काळात उपनगरांत दुधाची (डेअरी) दुकाने उघडण्यास काही ठिकाणी सकाळी 7 ते 11, सकाळी 10 ते 12 तर काही ठिकाणी सकाळी 10 ते 2 अशी वेळ देण्यात आली आहे. परंतु नेमक्या कोणत्या वेळेत डेअरी उघडी ठेवायची याबाबत अनेक ठिकाणी विक्रेत्यांत संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र आहे. काही पोलीस अधिकारी व कर्मचारी सांगतात की, सकाळी 10 ते 12 पर्यंत दूध विक्री करा, तर काही ठिकाणी 10 ते 2 पर्यंत डेअरी उघडी ठेवा, असे सांगितले जात आहे. यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊन ग्राहक व विक्रेते यांचा गोंधळ उडाला आहे.
खरेदीसाठी कमी वेळ असल्यामुळे ग्राहक विक्रीच्या ठिकाणी दुकानांमध्ये प्रचंड गर्दी करीत असून, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग बोजवारा उडत आहे. यामुळे ज्या हेतूने लॉकडाऊन व संचारबंदी लागू केलेली आहे. त्यास हरताळ फासला जात असल्याचे दिसते. दूध विक्रेत्यांकडे दूध वितरण हे सकाळी लवकर किंवा रात्रीच्या वेळी केले जाते. त्यामुळे दूध विक्रीची वेळ ही सकाळी 6 ते 10 ते किंवा 7 ते 11 तसेच सायंकाळी 7 ते 10 या वेळेत करण्याची परवानगी दिल्यास एकाच वेळी ग्राहकांची होणारी गर्दी टाळता येईल.
शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत दूध विक्रीस अडथळे येत असल्याने दुधाचे उत्पादन असूनही त्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत नाही यातून शेतकरीवर्ग व ग्राहकांचेही नुकसान होत आहे, असे दूध उत्पादन व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांनी पत्राद्वारे दुग्ध विकास मंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्राद्वारे कळविले असून दूध विक्रीच्या वेळेत नियोजन करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
दूध विक्रेत्यांना वेळ कमी असल्यामुळे दूध घेता येत नाही. त्यामुळे संस्थेमध्ये दूध तसेच शिल्लक राहात आहे. शिल्लक राहिलेल्या एवढ्या दुधाचे करायचे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. पोलीस प्रशासनाने योग्य वेळ ठरवून दिल्यास व दूध वितरण वाहने यांना विनाअडथळा दूध विक्रेतेपर्यंत जाऊ दिल्यास दूध वितरण योग्य होईल. ग्राहकांना देखील वेळेनुसार दूध खरेदी करता येईल.
– गोपाळराव म्हस्के, अध्यक्ष, दूध उत्पादन व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघ.