पिंपरी, दि. 20 – लोणावळा ते पुणे स्टेशनपर्यंतच्या लोकलचा थांबा शिवाजीनगरपर्यंतच केल्याने पुण्यात जाणाऱ्या पिंपरीतील चाकरमान्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. शिवाजीनगरपासून पुण्याकडे जाताना इतर वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यासाठी चांगलीच तारांबळ उडत आहे. कामावर जाण्यासाठी उशीर होत असल्याने चाकरमान्यांना नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
पिंपरी-चिंचवडवरून पुण्याकडे कामासाठी जाणाऱ्या नोकरदारांची संख्या मोठी आहे. लोणावळा ते पुणे स्टेशन ही लोकलची सेवा त्यासाठी उपयुक्त ठरत आहे. मात्र गेल्या आठवड्यापासून लोकलच्या वेळापत्रकांमध्ये बदल करण्यात आला आहे. पुणे स्टेशनपर्यंत जाणारी लोकल शिवाजीनगर पर्यंतच थांबविण्यात येत आहे. सकाळी सात वाजता पुण्याकडे जाणारी लोकल शिवाजीनगर स्थानकावरच थांबत आहे. तसेच सायंकाळच्या वेळी पिंपरीकडे येण्यासाठी शिवाजीनगरला यावे लागत आहे.
सायंकाळी असणाऱ्या दोन ते तीन लोकलच्या फेऱ्या शिवाजीनगरपर्यंतच सोडण्यात येत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना त्याचा त्रास होत असून असा बदल का केला असा सवाल शहरातील नागरिक उपस्थित करत आहेत. पूर्वीप्रमाणेच लोकल सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पुण्यात ससूनला मी कार्यरत आहे. लोकल पुणे स्टेशनपर्यंत असताना नोकरीवर जाणे सोयीचे होत असे. आता शिवाजीनगरपर्यंत लोकल थांबवली जात आहे. त्यामुळे पुणे स्टेशनपर्यंत इतर वाहनांनी जावे लागत आहे. त्यामुळे तारांबळ उडत आहे. लोकलची सुविधा नियमित करावी.
– डॉ. सोमनाथ सलगर, सहाय्यक प्राध्यापक, ससून महाविद्यालय, पुणे.