हिंगोली (शिवशंकर निरगुडे) – वसमत तालुक्यातील एका तरुणाने भंगारातील साहित्य जमा करून ई बाईक बनवली आहे. एखादी वस्तू, वाहन, खराब झाले की आपण एक तर अडगळीला टाकतो, नाहीतर भंगारात टाकतो. परंतु, पार्डी (खुर्द) येथील एका होतकरू आणि शेतकरी कुटुंबातील युवकाने भंगारातील साहित्य गोळा करून चक्क उपयोगात येणारी दुचाकी बनविली आहे.
वसमत तालुक्यातील.पार्डी (खु.) येथील अल्पभूधारक शेतकरी लिंबाजी नरवाडे यांचा मुलगा लोभाजी नरवाडे (वय २०) याने वडिलांना ‘शेताकडे जाताना होणारा त्रास पाहून जिद्दीने प्रदूषणमुक्त दुचाकी बनविण्याचा निर्णय घेतला. प्रथम.लोभाजीने भंगारातील जुन्या दुचाकीचे ४ हजार रुपये किमतीत पार्ट खरेदी केले. दुचाकीसाठी लागणारी ७२ व्हॅट, ४० एएम पॉवरफुल.चार्जिंग बॅटरी तिची किंमत २२ हजार रुपये व २०० ते २५० किलो वजन ओढण्याची क्षमता असलेली पॉवरफुल ‘बीएलडीसी’ मोटार व इतर साहित्य खरेदी केले.
अवघ्या ३५ हजार रुपयांमध्ये भंगारातील काही साहित्य खरेदी करून दुचाकी बनवल्याने पंचक्रोशीत लोभाजीचे कौतुक होत आहे. ही दुचाकी अडीच.तास चार्जिंग केल्यानंतर तब्बल शंभर किलोमीटर धावते. दुचाकी बनविण्यासाठी लोभाजी नरवाडे याने तीन ते चार.दिवस याबाबतचा अभ्यास केला. यापुढे चारचाकी प्रदूषणमुक्त.कार बनविणार असल्याचा मानस त्याने बोलून दाखविला.
भंगारातील साहित्यातून बनवलेली दुचाकी आता रोडवर धावत आहे. ही दुचाकी बिनागिअरची असल्यामुळे कोणत्याही व्यक्तीला ती सहजतेने वापरता येते. तसेच या दुचाकीवर सहजतेने 200 ते 250 किलो वजन नेता येत आहे. व ही ई बाईक प्रदूषण मुक्त देखिल आहें
लोभाजी नरवाडे याचे प्राथमिक शिक्षण दांडेगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात झाले. वसमत येथे बारावी व बीए शिक्षण पूर्ण केले.पुढे नांदेड येथे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत अभ्यासक्रम पूर्ण केला. पुढे अजून टेक्निकल शिक्षण घेणार असल्याचेही लोभाजी याने सांगितले.