- -विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांचा सवाल
- -सायकल योजनेच्या नावाखाली 80 कोटींचा चुराडा
पुणे – शहराचे प्रदूषण कमी करण्याच्या नावाखाली “ई-बाइक’ योजना प्रस्तावित करून विशिष्ट कंपन्याचे हीत जपण्याचा घाट पालिकेतील सत्ताधारी भाजपने घातल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी केला आहे. अशाच प्रकारे सायकल योजना प्रस्तावित करून दोन वर्षांत ती गुंडाळण्यात आली. मात्र, या योजनेच्या नावाखाली 70 ते 80 कोटी रुपयांचा चुराडा सायकल योजनेसाठी आवश्यक कामांच्या नावाखाली केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
योजनेच्या नावाखाली खासगी कंपनीचा हीत साधण्याची प्रक्रिया स्थगित करून पुणेकरांच्या हिताचा व प्रदूषणविरहित शहर करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. शहरात सुमारे 36 लाख दुचाकी वाहने आहेत. त्यामुळे प्रदूषण सातत्याने वाढत असल्याचे भासवत प्रशासनाने या बाइक प्रकल्पासाठी सकारात्मक अहवाल दिला आहे.
त्यामुळे आता या योजनेच्या नावाखाली “ई-बाइक’साठी पार्किंग, चार्जिंग स्टेशन, अशा वेगवेगळ्या नावाखाली खर्च केला जाणार आहे. एका बाजूला प्रदूषण कमी करण्यासाठी आधीच कोट्यवधींच्या ई-बस घेतल्या असताना, आता पुन्हा “ई-बाइक’ घेतल्या जात आहे. त्यामुळे या योजनेबाबत असलेल्या प्रश्नांची सर्व उत्तरे द्यावीत. त्यानंतरच याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.