देशातील सर्वाधिक गुऱ्हाळांची संख्या असलेला दौंड तालुका कृषी अर्थकारणाच्या नकाशावर ठळकपणे अधोरेखित आहे. तालुक्याच्या अर्थकारणाला दिशा देणाऱ्या गुऱ्हाळघरांमुळे ग्रामजीवनाला चालना मिळाली आहे. गेल्या 80 वर्षांत दौंडचा पॅटर्न जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि देशाला परिचित आहे. ऊस उत्पादक, कामगार, वाहतूकदार, गुऱ्हाळमालक आणि त्यावरील अवंलबून असणारे पूरक घटक कृषी क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरला आहे. (दि.1) जुलै रोजी
कृषिदिन साजरा होत आहे. त्यानिमित्त दौंड तालुक्यातील गुऱ्हाळघरांच्या
प्रचंड व्याप्तीवर टाकलेली नजर…
देशातील कृषिक्षेत्राचे अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान आहे. शेतीवर आधारित व्यवसायाचे महत्व आजही अर्थकारणाला गती देणारे ठरले आहेत. भविष्यामध्येही ते टिकून राहणार आहेत. यात शंका नाही. ग्रामीण भागातील प्रगतीसाठी केवळ शेतीवरच अवलंबून न राहता शेतीवर आधारित उद्योगधंद्यांची नित्तांत गरज आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील तरुण शेतकरी वर्ग, शेतीवर आधारित व्यवसाय म्हणून गुऱ्हाळ व्यवसायात उतरतो आहे. दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणात बागायती क्षेत्र, शाश्वत पीक म्हणून ऊस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. याशिवाय शेजारील शिरूर तालुक्यातील नदीपट्ट्यातील ऊस मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो. दौंड तालुक्यात चार साखर कारखाने असूनसुद्धा गुऱ्हाळांची संख्या 400 ते 450 च्या घरात आहे.
जुन्या काळी उसाला पर्याय म्हणजे गुऱ्हाळ हे एकमेव साधन होते. त्यानंतर साखर कारखाने आले. त्यावेळी बैलाने फिरणारे लाकडाच्या चरकाचे, तेलाच्या घाण्यासारखा घाना असायचा, चुलांगण साध्या पद्धतीचे कढई, खाली समोर मोठा दरवाजा, त्यातूनच जळण आत टाकले जाई. त्यानंतर लोखंडी तीन लाटीचा चरक आला. कालांतराने बदल होत गेला.
आता यांत्रिक व विद्युतशक्तीवर चालणारे क्रेशर आले. नवीन प्रकारचे चुलांगण, सुधारित प्रकारच्या भट्ट्या आल्या आहेत. जळण कमी लागू लागले आहे. परिणामी उत्पादन व गुणवत्ता वाढली आहे. त्यामुळे गावागावांतील तरुण गूळ व्यवसायामध्ये उतरू लागला आहे. गुळाचा गुणधर्म आरोग्यवर्धक असल्याने व त्याची मोठ्या प्रमाणात जागरूकता झाल्याने गुळाचा खप जास्त प्रमाणात वाढला आहे.
पूर्वी गुळाची ढेप 10 ते 20 किलोपर्यंत असायची. बदलत्या काळानुसार व विभक्त कुटुंब रचणेप्रमाणे ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन त्यात बदल करून अर्धा किलो, एक किलो गुळाचे पॅकिंग ग्राहकाच्या पसंतीस उतरले आहेत.
गुळाचे मोदक, गुळाची वडी, गूळ पावडर, काकवी यांच्या ट्रेंडमुळे गुळाला मागणी जास्त वाढली आहे. गावोगावी गुळाच्या अमृततुल्यची दुकाने सुरू झाली आहेत. त्यामुळे गूळ उत्पादन व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत. सेंद्रिय गुळाची निर्मिती चांगल्या प्रमाणात होऊ लागली आहे. दौंडचा सेंद्रिय गूळ अनेक राज्यात व मॉलमघ्ये दिसू लागला आहे.
मध्यंतरीच्या काळात कुशल व अकुशल कामगारांच्या अडचणीमुळे बहुतेक गुऱ्हाळे परप्रांतीयांना चालविण्यास दिली होती. परंतु आता तरुण त्यात उतरल्याने ते स्वतः गुऱ्हाळे चालवित असल्याचे चित्र दौंड तालुक्यात दिसत आहे. आता काही ठरावीकच गुऱ्हाळे परप्रांतीयांकडे राहिले आहेत. गुऱ्हाळांमुळे शेतकऱ्याची पत निर्माण झाली आहे. शेतात उभा ऊस असेल तर लग्नकार्याला, अडीअडचणीच्या वेळेस गुऱ्हाळमालकांकडून आगाऊ पैसे मिळतात.साखर कारखान्यांच्या दोन ऊस तोडीमध्ये गुऱ्हाळाची तीन तोडी होतात.
एकरकमी पेमेंट मिळत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने कुटुंबातील अर्थकारणाला गती मिळाली आहे. कोणत्याही वजन काट्यावरून वजन करता येते, त्यामुळे त्याबद्दलचा संभ्रम निर्माण होत नाही. बाजारभावाच्या तुलनेत साखर कारखान्याच्या बरोबरीने किंवा त्याहीपेक्षा जास्त बाजारभाव शेतकऱ्यांना मिळत आहे. या कारणांनी शेतकऱ्याचा कल गुऱ्हाळांकडे वाढलेला दिसत आहे. मजुरांच्या हाताला काम मिळत आहे. गावोगावी गुऱ्हाळांच्या शेकडो कामगारांमुळे छोट्या, मोठ्या व्यावसायिकांना रोजगार मिळाला आहे.
सध्या पर्यावरणाच्या नियमांच्या विळख्यात गुऱ्हाळे सापडली आहेत. आधुनिकीकरण हा त्यास पर्याय आहे. ज्यांची आर्थिक बाजू भक्कम आहे. त्यांनी आधुनिक प्लांट चालू केले आहेत. परंतु इतका मोठा खर्च बहुतेक जणांच्या आवाक्याबाहेरचा आहे. तेही शक्य होईल. परंतु त्यांना अजून काही दिवस वेळ देणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना गरज आहे, शासनाच्या वित्त धोरणाच्या पाठिंब्याची.
दौंड तालुक्यातील तरूण शेतकरी संघटित होऊन व्यवसायात उतरला आहे. लाखो रुपयांची गुंतवणूक करून धाडस करीत आहेत. या व्यवसायाबद्दल कुठेही शिक्षण पद्धतीत शिकवले जात नसले तरी ते अनुभवाने आत्मसात करून योग्य नियोजन करून रात्रंदिवस कष्ट करण्याची तयारी असलेला दौंडच्या ग्रामीण भागातील तरुण उद्योजक बनू लागला आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यातच तसेच परदेशातील मॉलमध्ये दौंडचा गूळ पोहोचला आहे. ही दौंडकरांसाठी अभिमानाची बाब आहे. खऱ्या अर्थाने तालुक्याच्या अर्थकारणाला दिशा देणाऱ्या गुऱ्हाळघरांमुळे कृषी व्यवसाय आणि पूरक घटकांना चालना मिळाली आहे. दौंड तालुका गुळाचे आगार बनतोय, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
गुळाचे आरोग्यदायी उपयोग
गूळ आणि आले एकत्र गरम पाण्यात प्यायल्याने घश्यात होणारी खवखव कमी होते. गुळासोबत आले खाल्ल्याने सांधेदुखीचा त्रास दूर होण्यास मदत होतो.
नियमित गुळाचे सेवन केल्याने पचन क्रियेत अधिक सुधारणा होते. त्याप्रमाणे बद्धकोष्ठता, गॅस, ऍसिडिटीच्या समस्या दूर होतात.
गुळामुळे रक्तदाब नियंत्रीत राहते. ज्यांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे. त्यांना दररोज गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो.
शेंगदाणे आणि गूळ खाल्याने शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते.
रोज गूळ खाल्ल्याने शरीरातील ऊर्जा वाढते, यासोबतच रक्तातील साखर वाढत नाही.
गुळामूळे आतड्यांचे कार्य चांगले राहते. रक्तातून हानिकारक टॉक्सिन बाहेर काढण्यास मदत होते.
गुळात सोडियम, पोटॉशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस मोठ्याप्रमाणात असते. त्यामुळे ही पोषकतत्वे हाडे मजबूत ठेवण्यास मदत होते.
-त्रिभूज शेळके (पारगाव)