नवी दिल्ली – कॉंग्रेसकडून विधानसभा निवडणुकांत चांगली कामगिरी होण्याचे दावे केले जात होते. प्रत्यक्षात, त्या निवडणुकांचे निकाल कॉंग्रेसला थोडी खुशी आणि जादा गम देणारे ठरले आहेत.
निवडणुकांना सामोऱ्या गेलेल्या राज्यांत प्रचारावेळी कॉंग्रेसला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत होते. त्यामुळे निवडणुकांत कॉंग्रेसचा वरचष्मा राहण्याची चर्चा होती. काही मतदानोत्तर चाचण्यांनी तर कॉंग्रेसला तीन राज्यांत यश मिळण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र, तसे यश भाजपच्या नावावर जमा झाले.
कॉंग्रेसला सत्ता असलेली राजस्थान आणि छत्तिसगढ ही दोन्ही राज्ये गमवावी लागली. मात्र, तेलंगणाने सत्ता हाती सोपवल्याने त्या पक्षावर नामुष्कीची वेळ आली नाही. निवडणुकांआधी कॉंग्रेसकडे स्वबळावर ४ राज्यांची सत्ता होती. आता हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या ३ राज्यांमध्येच त्या पक्षाची सत्ता असेल. अर्थात, देशातील सर्वांधिक राज्यांत भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष असण्यावर कॉंग्रेसला समाधान मानता येणार आहे.
विधानसभा निवडणुकांत चांगली कामगिरी झाली असती तर कॉंग्रेसचे इंडिया या विरोधकांच्या आघाडीतील वजन आणखी वाढले असते. आगामी लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या चर्चेवेळी त्या पक्षाची बार्गेनिंग पॉवर वाढली असती. पण, विधानसभा निवडणुकांचे निकाल कॉंग्रेसला बॅकफुटवर नेणारे ठरले आहेत.