एकापेक्षा जास्त खात्यांचा घेतला जाणार आढावा
पुणे – एखाद्या व्यक्तीची किंवा कंपनीची एक किंवा अनेक बॅंकांत किती खाती असावीत याला सध्यातरी मर्यादा नाही. मात्र, यामुळे मनी लॉन्डरिंगसारखे बरेच गैरव्यवहार होत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे अशा खात्यावर मर्यादा आणण्याच्या शक्यतेवर विचार केला जात आहे. त्यासाठी प्रसंगी कायदा केला जाऊ शकतो.
व्यक्ती किंवा कंपन्यांकडून अनेक खाती उघडून त्याद्वारा करचुकवेगिरी करणे किंवा पैसे बेकायदेशीरपणे पाठविण्याचे प्रकार केले जाऊ शकतात, असे पाहणीत आढळून आले आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीच्या नावावर 87 खाती असल्याचे आढळून आले. या व्यक्तीने या खात्यांच्या माध्यमातून 380 कोटी रुपये गैरमार्गाने पाठविले असल्याचे आढळून आले. त्यानंतर सावध झालेल्या सरकारने यावर अंकुश कसा घातला जाईल, या शक्यतेवर विचार चालू केला आहे.
बॅंका, प्राप्तीकर विभागादरम्यान समन्वय वाढणार
बॅंका आणि प्राप्ती कर विभागादरम्यान समन्वय वाढणार आहे. त्यासाठी खात्यांची संख्या मर्यादित केल्यास हा समन्वय अधिक परिणामकारक होऊ शकतो. नवीन करंट अकाऊंट उघडताना काळजी घ्यावी अशा सूचना रिझर्व्ह बॅंकेने व्यावसाईक बॅंकांना अगोदरच दिलेल्या आहेत. त्याचबरोबर इतर बॅंकांचे ना हरकत प्रमाणपत्र असल्यासच कर्ज देण्याबाबत बॅंक आग्रही आहेत.