जयपूर/भोपाळ/लखनौ – राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्त प्रदेशात वीज कोसळल्याने अंदाजे 40 जणांचा मृत्यू झाला आहे. देशाच्या विविध भागांमध्ये वीज कोसळण्याच्या घटना एकाच दिवशी घडल्या आहेत.
वीज कोसळण्याने राजस्थानमध्ये सर्वाधिक 23 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये जयपूरमधील 12 जणांचा समावेश आहे. तर 27 जण जखमी झाले आहेत. जयपूर व्यतिरिक्त कोटा, झालावाड, बारण, धोलपूर, सवाई माधोपूर आणि टोंक या जिल्ह्यांमध्येही वीज कोसळून मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
जयपूरमध्ये अंबर फोर्टजवळच्या वॉच टॉवरजवळ झालेल्या दुर्घटनेमध्ये मरण पावलेल्या 12 जणांमध्ये बहुतेक जण युवक होते. तर 7 लहान बालकांचाही मृत्यू झाला आहे. याशिवाय 11जण जखमी झाले आहेत. हे सर्वजण पर्यटनाला गेले होते.
टॉवरवर असताना सेल्फी घेत असताना अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. हा टॉवर कोसळल्याने 27 जण जखमी देखील झाले आहेत, असे आपत्ती व्यवस्थापन व मदत विभागाचे प्रधान सचिव आनंद कुमार यांनी सांगितले.
वीज कोसळून 11 बकऱ्यांसह 16 जनावरांचाही मृत्यू झाला आहे. हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यताही असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने म्हटले आहे.
उत्तर प्रदेशात कौशंबी, फतेहपूर आणि फिरोझाबाद या जिल्ह्यांमध्ये रविवारी वीज कोसळून 10 जणांचा मृत्यू झाला. कौशंबी जिल्ह्यात भातशेतीची पेरणी करणारे काही शेतकरी झाडाखाली थांबले असताना झाडावर वीज कोसळल्याने 4 जणांचा मृत्यू झाला. फतेहपूर जिल्ह्यात तिघाजणांचा तर फिरोझाबाद जिल्ह्यामध्ये दोघांचा अशाचप्रकारे झाडाखाली थांबलेले असताना वीज कोसळून मृत्य झाला.
मध्यप्रदेशातही एओकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. तर वेगवेगळ्या घटनांमध्ये 11 जण जखमी झाले आहे. ग्वाल्हेर जिल्ह्यात सोनारपुरा गावात दोघे जण जनावरे चरायला नेत असताना त्यांच्यावर वीज कोसळली. अन्या दोघेजण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तपियान गावात अशाच एका घटनेत पिता पुत्र गंभीर जखमी झाले होते. शिवपुरीतील बडोदी, नरही आणि सलैया या गावात वीज कोसळल्याने अन्य सात जण जखमी झाले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पंतप्रधानांकडून मदत जाहीर
या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान तसेच जखमींना मदत जाहीर केली आहे.मध्य प्रदेशातील काही भागात वीज पडून झालेल्या जीवितहानीचे तीव्र दुःख झाले आहे. असे पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर संदेशात म्हटले आहे. दुर्घटनेची झळ बसलेल्यांना राज्य सरकारकडून शक्य तेवढी मदत दिली जाणार आहे. मृत्युमुखी पडलेल्यांच्या जवळच्या वारसाला 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान तर जखमींना 50 हजार रुपये पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दिले जातील.