वाल्हे, (वार्ताहर) – आडाचीवाडी (ता.पुरंदर) येथील 70 फूट खोल विहिरीत पडलेल्या हरणास सुरक्षित बाहेर काढून जीवदान दिले. मागील काही दिवसांपासून, वाढत्या उष्णतेमुळे वन्यप्राणी, अन्न- पाण्याच्या शोधात मानवी वस्तीमध्ये, दिवसाही दिसू लागले आहेत. या वन्य प्राण्यांच्या मागे, भटकी कुत्री लागत असल्याने, ते धावताना अशा घटना वारंवार घडत आहेत.
सोमवारी (दि.15) आडचीवाडी येथील शेतकरी बजरंग पवार यांनी इला फाऊंडेशन संस्थेत फोन करून विक्रांत ज्ञानदेव पवार यांच्या विहिरीमध्ये हरीण पडले असल्याची माहिती दिली. दरम्यान, रेस्कू व्हॅनमध्ये केज (प्राणी ने आण करण्यासाठीचा पिंजरा) घेऊन घटनास्थळी मइला फाऊंडेशनफ ची टीम दाखल झाली. दरम्यान, हरीण पाण्याच्या बाजूला छोट्या जागेत बसले होते.
विहीर 70 फूट (दहा परस) फूट खोल असल्याने, विहिरीमध्ये उतरण्यासाठी दोर बांधणे, केज सोडण्यासाठीचे दोर बांधण्यात आले. दरम्यान, बाळू खोमणे, बाळासाहेब माळवदकर, जेजुरी वरून, या ठिकाणी दाखल होत सुरक्षा बेल्ट, हेल्मेट घालून बाळू खोमण विहीर उतरले.
त्यांनी कमरे इतक्या पाण्यात हरणाला पकडून ठेवले. दरम्यान, रेस्कू टिमने केज (पिंजरा) खाली सोडल्याने त्यामधे अलगद ठेऊन हरीण सुरक्षितरित्या बाहेर काढले. दरम्यान, विल्लू सि. पूनावाला वन्यप्राणी हॉस्पिटल पिंगोरी (ता.पुरंदर) येथे तपासणी करून, प्रथमोपचार करून त्याच परिसरात सायंकाळी सोडण्यात आले.
सध्या वाल्हे, अडाचीवाडी, पिंगोरी, कोळविहिरे, जेजुरी, साकुर्डे या परिसरात वन्यजीवांच्या अन्न- पाण्याची भीषणटंचाई असल्याने, अन्न-पाण्याच्या शोधात, वन्यजीवांचे स्थलांतर होत आहे; त्यामुळे भटकी कुत्री त्यांचा पाठलाग करताना हल्ला होणे, पाण्यासाठी पडक्या विहिरीत उतरताना प्राण्यांचे पडण्याचे प्रमाण वाढले आहे मागील 15 दिवसांत विहिरीत पडलेल्या चार चौशींगा, एक चिंकारा यांना इला फाऊंडेशनच्या रेस्क्यु टीमने वाचवले आहेत. – डॉ. सतीश पांडे, संस्थापक, इला फाऊंडेशन