शर्मिला जगताप
हमाल, कष्टकरी यांच्या पाठीवरचे ओझे तुम्ही पाहिले असेलच, पण तो कष्टकरी ते ओझे योग्य ठिकाणी खाली उतरवतो. त्यामुळे त्याच्या पाठीवरचे ओझे हलके होते. तुम्ही-आम्ही मात्र आपल्या मनात कित्येक वर्षांपासून ओझे बाळगून असतो. एखद्याविषयी आपल्या मनात द्वेषाचे ओझे असते, तो भार आपण कधीतरी खाली उतरवायला हवा. एखाद्या विषयी गैरसमजाचे ओझे आपल्या मनात असते. एखाद्याने काही चुकी केली असेल किंवा गैरसमजातून चुकून एखादे कृत्य घडले असेल तरी आपण त्या व्यक्तीविषयी आपल्या मनात चुकीचे ओझे बाळगत असतो. त्या व्यक्तीला चूक सुधारण्याची संधी देऊन आणि त्या व्यक्तीविषयी आपण सकारात्मक विचार करून आपल्या मनावरचे ओझे हलके करू शकतो.आपण बऱ्याचवेळा स्वतःपेक्षा इतरांचाच बरा-वाईट विचार करीत वेळ वाया घालवत असतो.
एकदा दोन शिष्यांना नदी पार करून दुसऱ्या किनाऱ्यावरील मंदिरात जायचे असते. ते नदीकाठी पोहोचतात तेव्हा त्यांना एक रूपसुंदरी नदीकिनारी उभी असलेली दिसते. त्या रूपसुंदरीला नदी पार करायची असते. मात्र ती एकटीच असल्याने शिवाय नदीत बरेच पाणी असल्याने ती नदीत उतरायला घाबरते.
ती रूपसुंदरी या दोघा भिक्षूंकडे नदी पार करण्याची विनंती करते. मात्र ते दोघे ब्रह्मचारी असल्याने एका स्त्रीला हात कसा लावायचा, या विचारात ऐकमेकांकडे पाहतात. त्यावर एक भिक्षू त्या सुंदरीला म्हणाला, “”हे देवी, आम्ही बालब्रह्मचारी असल्यामुळे एका स्त्रीला हात लावण्याचे पाप करू शकत नाही.” यावर ती रूपसुंदरी म्हणाली, “”पण एखादी व्यक्ती अडचणीत असेल तर तिला मदत करण्यास धर्म आडवा येत नाही.” मात्र तरीही आपल्या मतावर एक भिक्षू ठाम असतो.
तेवढ्यात दुसरा भिक्षू पुढे येऊन त्या रूपसुंदरीला आपल्या पाठीवर घेतो आणि नदी पार करण्यासाठी निघतो. नदीत बऱ्यापैकी पाणी असते म्हणून तो भिक्षू दुसऱ्या भिक्षूला हात हातात घेऊन चालण्यास सांगतो.
मात्र तो भिक्षू त्या स्त्रीचा स्पर्श होईल आणि आपला धर्म नष्ट होईल या भीतीने त्यांच्यामागे काही अंतर ठेवून चालू लागतो. रूपसुंदरीला पाठीवर घेऊन जाणारा भिक्षू स्थितप्रज्ञ होऊन नदीतील खाचखळग्यांचे आणि पाण्याच्या प्रवाहाचे अडथळे पार करून शेवटी नदी पार करतो. नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचताच तो भिक्षू रूपसुंदरीचे आपल्या पाठीवरील ओझे खाली उतरवतो. ती सुंदरी त्यांना धन्यवाद देऊन निघून जाते.
ते दोघे भिक्षू देवाची प्रार्थना करतात. नदीत स्नान करतात आणि गुरूच्या शिकवणीप्रमाणे मंदिरात ध्यान करण्यास बसतात. दोघेही डोळे मिटून ध्यानधारणा करण्यास सुरुवात करतात. मात्र त्यातील एका भिक्षूला आपल्या गुरूबंधूंचे वागणे काही पटले नव्हते. तो त्याला म्हणाला, “”तू बालब्रह्मचारी असूनही एका स्त्रीला पाठीवर का घेतले?”
यावर दुसरा भिक्षू म्हणाला, “”गुरूबंधू, मी त्या स्त्रीचे पाठीवरचे ओझे केव्हाच खाली उतरवले आहे. मात्र त्या स्त्रीविषयीचे आणि माझ्याविषयीचे गैरसमजाचे ओझे अजूनही तुझ्या मनात आहे, ते खाली उतरव. मी फक्त मदत म्हणून हात पुढे केला आणि मदत करून झाल्यावर मी तो विषय विसरूनही गेलो. तूसुद्धा स्थितप्रज्ञ होऊन मनावरील ओझे हलके कर. आपले मन निर्विकार असावे. त्यामुळे मनावर कसलेही ओझे राहत नाही.