बाबासाहेब गर्जे
पाथर्डी – पंचनाम्यांचा फार्स नकोच. त्यातून बहुतेकवेळा शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही. त्यामुळे पंचनामे करण्याऐवजी नजरअंदाजे शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर करा, अशी भूमिका घेवून भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी पाथर्डीत आज राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा ताफा रोखला.
अतिवृष्टीने नगर जिल्ह्यात शेतमालाचे मोठेच नुकसान झालेले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी आज पालकमंत्री मुश्रीफ यांनी पाथर्डी व शेवगाव तालुक्यांतील काही गावांचा पाहणी दौरा आयोजित केला होता. पाथर्डी शहरातून भालगावकडे जाणाऱ्या रस्त्याने ते पुढे निघाले असता, पंचायत समितीसमोर भाजपच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आडवे होवून पालकमंत्री मुश्रीफ यांचा ताफा अचानक अडविला.
भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर, गोकुळ दौंड, वाळुंजचे सरपंच रणजित बेळगे, रवींद्र वायकर, पंचायत समितीचे सदस्य विष्णुपंत अकोलकर, सुनील ओव्हळ, सुभाष केकाण, पंचायत समितीचे माजी सभापती काकासाहेब शिंदे, आरपीआयचे (आठवले गट) तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू, उद्धव माने, राजेंद्र दगडखैर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांचा ताफा रोखून धरला होता.
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात वेळ दवडवण्यापेक्षा सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्या, अशी भूमिका या पदाधिकाऱ्यांनी आक्रमकपणे पालकमंत्री मुश्रीफ यांच्या पुढ्यात मांडली. तसेच मागणीचे निवेदन त्यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांना दिले. भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांनी संपूर्ण तालुक्यात फिरून नुकसानीची पाहणी केली आहे. दोन्ही तालुक्यांत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नव्याने पंचनामे करण्याची गरज नाही, अशी भूमिकाही या पदाधिकाऱ्यांनी मांडली. भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन पालकमंत्री पुढील गावाची पाहणी करण्यासाठी रवाना झाले.