पुणे – गणेशोत्सव मंडळांना मागील वर्षी देण्यात आलेले परवाने सन 2026 पर्यंत वैध असणार आहेत. त्यामुळे त्यांनी या वर्षी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. ज्या गणेशोत्सव मंडळांनी यापूर्वी परवानगी घेतलेली नाही, अशांनी नव्याने अर्ज करावे. यंदाचा दहीहंडी, गणेशोत्सवासह अन्य सण-उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करावा. त्यासाठी संबंधित यंत्रणा आणि मंडळांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
गणेशोत्सव, दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने तयार केलेल्या नियमावलीबाबत विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, उपआयुक्त संदीप गिल, आर राजा, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, वाहतूक शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर, विभागीय उपायुक्त वर्षा उंटवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कासगावडे उपस्थित होते.
सणाच्या काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था उत्तम राहील यादृष्टीने पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे. नागरिकांनी आपल्या सूचना जिल्हाधिकारी, पुणे मनपा आणि पोलीस आयुक्त कार्यालय यांच्याकडे सादर कराव्यात. प्राप्त सूचनांवर प्रशासनाच्या वतीने सकारात्मक दखल घेऊन त्याचे निराकरण करण्यात येईल. वाहतुकीतील बदलाबाबत नागरिकांना अवगत करावे. भाविकांना गणेशोत्सव व दहीहंडी बघता यावे यासाठी रस्त्याचा दोन्ही बाजू खुल्या ठेवाव्यात, असा सूचना गोऱ्हे यांनी दिल्या.
ध्वनिक्षेपकाची 5 दिवस सवलत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सुचनेनुसार गणेशोत्सवात 23, 24, 26, 27 आणि 28 सप्टेंबर या 5 दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाच्या वापरासाठी सवलत दिली आहे. गौरी विसर्जनाच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत विसर्जनाची सवलत दिली आहे. पुणे मनपाच्या वतीने बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच दहीहंडी या सणाला साहसी खेळ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने मुंबईच्या धर्तीवर सुरक्षितेतच्या दृष्टीने मंडळाला मार्गदर्शनपर जनजागृतीपर प्रात्यक्षिके घेण्याचे निर्देश देण्यात दिले आहेत.