नगर, (प्रतिनिधी) – राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस असे चिन्ह दिले आहे. तुतारी वाजते का की, त्यातून फक्त हवाच निघते, हे निवडणुकीत पाहू. अनेक पक्ष असतात व त्यांना अनेक चिन्ह मिळत असते. त्यावर अनेक हरकतीही दाखल होतात. तुतारीवरही एखादी हरकत दाखल होऊ शकते. त्यामुळे एकदा सारे क्लिअर होऊ द्या व तुतारीतून आवाज निघतो की नाही, हे पाहू, अशी टिपणी खा. डॉ. सुजय विखे यांनी केली.
तसेच कांदा निर्यात बंदी उठली की नाही, अशी शंका घेणारांना सांगतो की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दुसर्यांदा यासंदर्भात घेतलेली भेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने आम्ही घेतली होती आणि ती भेट यशस्वी झाली आहे. कांदा निर्यात बंदी उठलीच आहे. त्यामुळे आमच्या गृहमंत्री शहांच्या भेटीवर शंका घेणारांवर मला टिपणी करायची नाही व याबाबतच्या कोणत्याही प्रश्नाला मग उत्तरही देणार नाही, असे स्पष्टीकरण नगर दक्षिणेचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी शुक्रवारी येथे दिले. दरम्यान, खा. विखेंनी पक्षाचेच आमदार प्रा. राम शिंदे यांना यातून सूचक टोला लगावल्याचे बोलले जात आहे.
तसेच कादा निर्यात बंदी उठवण्याची मागणी करण्यासाठी खा. डॉ. विखे हे आधी गृहमंत्री शहा यांना भेटले होते व त्यानंतर मागील आठवड्यातही खा. डॉ. विखे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पुन्हा गृहमंत्री शहांना भेटले होते. त्यांच्या या दुसर्या भेटीवर स्वपक्षासह विरोधकांनीही संशय व्यक्त केला होता. दुसर्यांदा त्यांना भेटले तरी कांदा निर्यात बंदी उठली की नाही, निर्यात बंदी का झाली नाही, असा सवाल प्रा. शिंदे यांनी केला होता. त्याला माध्यमांशी बोलताना खा. डॉ. विखे यांनी प्रत्युत्तर दिले.
खा. डॉ. विखे म्हणाले, गृहमंत्री शहा यांच्याशी आमची भेट झाल्यानंतर सायंकाळी लगेच ५० मे. टन कांदा निर्यातीचा आदेश जारी झाला व त्यामुळे बांगला देश, मालदीव व भुतानला कांदा निर्यात करण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे कोणतेही स्टेटमेंट करून कांदा उत्पादक व जनतेची फसवणूक कोणी करू नये, असे आवाहन करून ते पुढे म्हणाले, शहा हे मंत्री समितीचे अध्यक्ष आहे व त्यांच्याशी आमची झालेली भेट यशस्वी झाली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने ही भेट झाली होती. त्यामुळे या भेटीबद्दल शंका घेणारांवर टिपणी करणार नाही, असेही खा. विखेंनी सूचक स्पष्ट केले. 3 लाख मे. टन कांदा निर्यात टप्प्या टप्प्याने होणार आहे. कोणीही शंका घेण्याचे कारण नाही. त्यामुळेच कांदा उत्पादक शेतकरी व जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे, असा दावाही खा. विखेंनी केला. दरम्य़ान माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाचे दुःख व्यक्त करून खा. डॉ. विखे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
जलजीवन मिशनमधील कामांचे टेंडर महाविकास आघाडीच्या काळात
जलजीवन मिशनमधील कामांचे टेंडर, ठेकेदार नियुक्ती व वर्कऑर्डरचे काम मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाले आहे. त्यांनाच मलिदा गेला आहे. सत्तांतरानंतर त्यांचा हिशेब कोलमडल्याने ते तक्रारी करीत आहेत, अशी टीका खा. डॉ. विखेंनी आ. प्राजक्त तनपुरे यांच्या आरोपावर केली. मविआ काळातच या योजनेचा आराखडा मंजूर झाला होता.
त्यावेळी त्यांनी नियुक्त केलेल्या ठेकेदारांवर आम्ही आक्षेप घेतले नाही. सत्तांतरानंतर आम्ही नवे ठेकेदार नेमू शकलो असतो. पण आमची ती नीतीमत्ता नाही. उलट, या योजनेतील त्रुटी दूर केल्या व योजनेतून राहिलेल्या वाड्या-वस्त्यांचा समावेश आम्ही योजनेत केला, असा दावाही खा. डॉ. विखेंनी केला.