राहुरी, (प्रतिनिधी) – डॉ. बा.बा. तनपुरे सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर चालवायला देण्याचे जिल्हा बँकेकडून जवळपास निश्चित झाले असताना एकच निविदा आल्याने जिल्हा बँकेने बैठकीत असलेला विषय क्रमांक १९ रद्द केला आहे. त्यामुळे कारखान्याचे आजचे मरण उद्यावर ढकलले गेल्याची प्रतिक्रिया सभासदांमधून व्यक्त होत आहे. प्रशासनाने तत्काळ निवडणूक लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
कारखाना हा २५ वर्षासाठी भाडेतत्वावर देण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत पुणे येथील उद्योगपती श्रीयुत् दुग्गड अँड कंपनीची केवळ एकच निविदा आल्याने जिल्हा सहकारी बँकेने ही प्रक्रिया थांबवली आहे. एकच निविदा आल्याने जिल्हा बँकेने आज झालेल्या बैठकीत कारखाना भाडेतत्वावर चालविण्यास देण्याचा विषय रद्द केल्यामुळे राहुरी तालुक्यातील शेतकरी सभासद व कामगार संघटना यांच्यामध्ये समाधान व्यक्त होत आहे.
कारखाना जर भाडेततत्वावर चालविणेस दिला तर सभासद शेतकरी व कामगार यांचा जिल्हा बँकेच्या विरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला असता. हा कारखाना शेतकरी सभासद व कामगार संघटना यांच्या मालकीचा राहावा म्हणून कारखाना बचाव कृती समिती सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्यामुळे प्रशासनाने निवडणूक घेऊन कारखाना सभासदांच्या प्रतिनिधींना चालविण्यास देण्याची मागणी होत आहे.
आजच्या बैठकीत केवळ एकच निविदा आल्याने जिल्हा सहकारी बँकेने सदरचा ठराव नामंजूर करून त्यावरील निर्णय रद्द केल्याबद्दल कारखाना बचाव कृती समितीचे अमृत धुमाळ, अरुण पाटील कडू, पंढरीनाथ पवार, राजुभाऊ शेटे, संजय पोटे, दिलीप इंगळे,
कोंडा पाटील विटनोर, सुखदेव मुसमाडे, भगवान गडाख, अप्पासाहेब ढूस, सुभाष करपे, भारत पेरणे आदींनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे आभार व्यक्त केले. तात्काळ कारखान्याची निवडणूक घेऊन कारखाना हा सभासदांच्या मालकीचा ठेवून सभासदांमधून निवडून आलेल्या संचालक मंडळाला कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा अधिकार देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.