संचालक उदयसिंह पाटील यांचे प्रतिपादन; कारखान्यात बॉयलर अग्निप्रदीपन
रेडा (प्रतिनिधी) – इंदापूर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना शेतकऱ्यांचे केवळ हक्काचे पाणी न मिळाल्याने, शेतातच ऊस करपले, जळाले. तरीदेखील येथील शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे या सामाजिक भावनेतून राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने तोटा सहन करून दरात कोणतीही कपात न करता, शेतकऱ्यांचा ऊस घेतला जो कारखाना अडचणीच्या काळात आपल्या पाठीशी उभा राहतो त्या नीरा-भीमा कारखान्याला आपल्या शेतात व परिसरात असणारा सर्व ऊस गळीतासाठी देऊन सहकार्य करावे, असे आवाहन इंदापूर दूध संघाचे माजी चेअरमन व नीरा-भीमा साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील यांनी केले.
इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचा 19वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ आज (गुरुवारी) सकाळी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार व संचालक मंडळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संचालक उदयसिंह पाटील बोलत होते. यावेळी कृष्णाजी यादव, मयूरसिंह पाटील, प्रशांत पाटील, विलासराव वाघमोडे, विकास पाटील, अशोक वनवे, मंगेश पाटील, किरण पाटील, अनिल पाटील, धनंजय कोरटकर, महादेव घाडगे, सुरेश मेहेर, रणजित रणवरे, अजिनाथ बोराडे, शंकरराव घोगरे, दादासाहेब घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, सतीश अनपट, नामदेव किरकत, चंद्रकांत भोसले, शिवाजीराव शिंदे, शिवाजी हांगे, अशोक वणवे, दत्तात्रय शिर्के, तानाजीराव नाईक, राजकुमार जाधव, अनिल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना उदयसिंह पाटील म्हणाले की, साखर उद्योगाच्या इतिहासात यंदाचा हा गळीत हंगाम सर्वात छोटा होणार आहे. कारखान्याच्या शेतकी विभागाच्या अंदाजानुसार 130000 मे.टन ऊस हा शेतकऱ्यांचा परिसरातील मिळणार आहे व गेट केन ऊस 70000 टनापर्यंत कारखान्यास प्राप्त होणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा तसेच गेटकेन धारकांचा विश्वासाला कारखान्याने सातत्याने पात्र राहून व्यापारा पेक्षाही दर जास्त दिलेला आहे. त्यामुळे गेटकेन भागातून ऊस चांगल्याप्रकारे उपलब्ध होईल, असा विश्वास उदयसिंह पाटील यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांनी केले. संचालक तानाजी देवकर यांनी आभार मानले.
चेअरमन पवार यांना अनावर अश्रू….
नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार आपले मनोगत व्यक्त करताना हर्षवर्धन पाटील यांना विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशाच्या संदर्भाचा उल्लेख करीत असताना भाषणामध्ये अश्रू आवरता आले नाहीत. त्यामुळे अध्यक्ष पवार यांनी भाषण लवकर संपविले. या प्रसंगामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणचे वातावरण गंभीर झाले होते.