नवी दिल्ली – करोना फैलाव रोखण्यासाठी पुढील 2 ते 3 आठवडे युद्धपातळीवर प्रयत्न करू. पात्र लाभार्थींचे अधिकाधिक लसीकरण करण्यासाठी 11 ते 14 एप्रिल या कालावधीत लस उत्सव साजरा करू, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले.
देशातील करोना संकट पुन्हा गडद बनल्याचे चित्र आहे. त्यापार्श्वभूमीवर, मोदी यांनी देशातील स्थिती आणि लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची व्हर्च्युअल बैठक घेतली. त्यामध्ये बोलताना ते म्हणाले, प्रशासनाच्या व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज आहे. वर्षभराच्या लढ्यामुळे व्यवस्थेला थकवा जाणवू शकतो. त्यातून काहीशी ढिलाई होऊ शकते.
मात्र, आगामी काळासाठी प्रशासन मजबूत बनवण्याची गरज आहे. करोना फैलाव नियंत्रणात आणण्यासाठी चाचणी, संपर्कशोध, उपचार, करोनाविषयक योग्य वर्तणूक आणि व्यवस्थापन या बाबींवर भर देण्याची गरज आहे.
करोनाशी लढण्यासाठी आता आपल्या देशाकडे आधीपेक्षा अधिक साधने उपलब्ध आहेत. मायक्रो कन्टेंन्मेंट झोनवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. अनेक राज्यांत प्रशासनाकडून ढिलाई होत आहे. त्यातून करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे समस्याही वाढत आहेत, असे त्यांनी अधोरेखित केले.