‘कोरोना’ नाव ऐकायला छान वाटतंय ना, प्रथमदर्शनी कुठल्यातरी सुंदर अशा विदेशी मुलीचं नाव असेल असच वाटतं. पण या छोट्याशा तीन अक्षरी शब्दाने जगात किती भयंकर वादळ उठवलंय. घड्याळाच्या काट्याच्या पुढे धावणार संपूर्ण जग क्षणार्धात स्तब्ध झालाय. संस्कृतीच्या विनाशाची सुरुवात तर नाही ना? हा प्रश्न बहुतेक जणांना भेसवायला लागला असेल. खरंच हे दिवस संपतील की नाही? ही भीती देखील बऱ्याच लोकांच्या मनात घर करून बसली असेल.
परंतु, “येणारी प्रत्येक वादळे ही आपल्याला उध्वस्त करण्यासाठी नसतात , तर आपण कोण आहोत? काय आहोत? याची जाणीव करून देण्यासाठी असतात.” असे मी एका ठिकाणी वाचले होते. आणि हे बऱ्याच अंशी खरेदेखील आहे. कारण प्रत्येक गोष्टीचा अंत हा नव्या गोष्टीची सुरुवात असते तसेच काहीतरी आतादेखील आहे.
आपण विचार केला का आज एकापेक्षा एक वरचढ असणारे अणुबॉम्ब जगात कित्येक देशांकडे आहेत. बसल्या ठिकाणी लांबच्या पल्ल्याचा प्रदेश बेचिराख करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. परंतु हे करता माणूस निसर्ग ही सगळ्यात मोठी शक्ती आहे हेच विसरून गेला होता. स्वतः च अस्तित्व टिकवण्याच्या नादात नव्हे स्वतः ला सर्वश्रेष्ठ मानण्याच्या नादात निसर्गाला , सृष्टीला क्षुल्लक समजू लागला होता की काय असा प्रश्न पडतो. त्यामुळे आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी निसर्गाने मानवाला दिलेला हा दृष्टांतच आहे याची जाणीव व्हायला लागली आहे.मला तरी वैयक्तिक असेच वाटतेय. बघा ना जगाला बेचिराख करण्याची क्षमता असलेला माणूस आज हतबल होऊन आपल्या अदृश्य शत्रूपासून वाचण्यासाठी बंदिस्त होऊन बसलाय.
या छोट्याशा विषाणूच्या निमित्ताने माणसाला अंतर्मुख होऊन विचार करण्याची संधीच मिळाली आहे असे मी म्हणेन. नाहीतर माणूस नुसताच शर्यतीत धवणाऱ्या घोडयासारख्या धावतोय धवतोय. शर्यतीत ती संपल्यावर घोड्याचा लगाम खेचायला त्यावर स्वार असणारा लगाम खेचतो त्यामुळे घोडा थांबतो तरी. तसं माणसाचं नव्हतं, त्याला कुठे थांबायचं माहितीच नाही. म्हणून सृष्टीने लगाम खेचून थोडा स्वलपविराम दिल्याचा भास होतोय, नव्हे तसच झालंय.
या निमित्ताने माणसाने हद्दपार करून टाकलेली माणुसकी जागी झालीय. पळता पळता थोडं थांबायला ही हवे. याची जाणीव माणसाला झाली. आपण काय मिळवलंय यापेक्षा काय गमावले याचा हिशोब जास्त व्हायला लागलाय. जगात सगळ्यात जास्त स्वतःचा जीव महत्वाचा याची काहींना जाणीव झाली असेल. तर आतापर्यंत आपण काहीच केलं नाही यापुढे करायला हवं म्हणून काही जागे झाले असतील. जे फक्त स्वतः पुरताच मर्यादित विचार करत असतील त्यांच्यातील माणुसकी जागी होऊन ते इतरांचा विचार करायला लागले असतील. बऱ्याच सकारात्मक गोष्टी या दिवसात आपण अनुभवतो आहोत.
लॉकडाऊनमुळे माणसाला एक गोष्ट नक्कीच समजली असेल स्वतःवर, संपत्ती वर अभिमान, गर्व असणे कित्पत योग्य किंव्हा अयोग्य आहे? जगण्याचा अर्थ हा प्रत्येकासाठी कधीच एक नव्हता आणि तो एक नसणार पण. परंतु जगण्याचे मायने बदलतील हे निश्चित आहे. आपण अनुभवलं य, माणूस जरी थांबला तरी सृष्टीच चक्र थांबलेलं नाही. सूर्य रोज आपल्या वेळेवर उगवतो मावळतो आहे. चंद्र- तारे रोज येतात जातात; त्यामुळे सृष्टीला माणूस असो किंव्हा नसो याचा काही फरक पडणार नाही. त्यामुळे यापुढे तरी कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं हे तरी शिकायलाच हवं.
मला तरी वाटतं जगाला थोडा ब्रेक हवाच होता. त्यामुळे माणसातली कुठेतरी लुप्त झालेली माणुसकी आणि माणूस जो माणूसपण विसरला होता ते मिळवण्याचा प्रयत्न करेल. काहींना हा प्रश्न पडत असेल की , “खरंच हे थांबेल का?” तर हो, थांबेल. आणि त्यानंतरच जग खूप वेगळंच असेल. आपण आपल्यात असणाऱ्या नकारात्मकतेला बाजूला ठेऊन विचार केला तर सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतील. सगळी वादळं एक ना एक दिवस शांत होतात तसेच हे पण होईल. त्यानंतरच जग खऱ्या अर्थाने पूर्णपणे वेगळं असणार आहे.कारण खूप गोष्टींचे अर्थ नव्याने उमगणार आहेत. काही नव्याने सुरू होणार आहेत, तर काही पूर्णपणे बदलणार आहेत. या सगळ्या अंधारातून नव्याने येणारा सूर्योदय सगळेजण वेगळ्याच दृष्टीने पाहणार आहेत. चला तर मग उद्याच्या नवीन उषःकाल साठी नव्याने तयार होऊया.
– पल्लवी बिबे-माळशिकारे
एम. ए, बी.एड, पुणे