मुंबई : संपूर्ण जग हे वातावरणीय बदलाच्या परिणामांशी लढा देत आहे. आपणही शासन, प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिक मिळून काम करूया, असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. स्थानिक पातळीवर सर्वांनी एकत्र येऊन लहान लहान पर्यावरणपूरक सवयींचा अंगिकार केल्यास हे बदल रोखण्यात आपण नक्कीच यशस्वी होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली संपर्क आणि स्त्री आधार केंद्रामार्फत आयोजित हवामान बदल आणि शाश्वत विकासाची उद्दिष्टे याबाबत जागृती निर्माण करणाऱ्या “मंथन’ या ऑनलाईन परिषदेचे उद्घाटन ठाकरे यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते.
राजकारण हे तळागाळापर्यंत पोहोचणारे आणि कामाच्या माध्यमातून समाधान देणारे क्षेत्र आहे. या माध्यमातून विधिमंडळ सभागृहातील चर्चेपासून गावपातळीपर्यंत वातावरणीय बदलाबाबत मंथन होऊ लागले आहे, ही अत्यावश्यक आणि सकारात्मक बाब आहे. वातावरणीय बदल स्वीकारून ते रोखण्यासाठी उपाययोजना करताना लोकसहभाग अतिशय गरजेचा आहे. माझी वसुंधरा अभियान राबविताना याचा अनुभव येत असून गावपातळीपर्यंत प्रत्येक जण आपली जबाबदारी ओळखून काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
शासनाने युनिसेफ सोबत शालेय अभ्यासक्रमासाठी तर संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमांतर्गत वातावरणीय बदलाबाबत काम करण्यासाठी करार केला असल्याची माहिती त्यांनी दिली. राजकारण करताना संपर्क आणि त्यातील संवाद हा गरजेचा असून संवेदनशील राहून लोकांचा आवाज ऐका, अशी शिकवण मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ नेत्यांनी दिल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
ही परिषद दोन दिवस चालणार असून यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ हवामान बदल आणि शाश्वत विकासाची उद्दिष्टे यांची सांगड घालून कृती आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने मंथन करणार आहेत.