नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोना पसरवरण्याचे खापर महाराष्ट्रावर फोडले हे दुर्दैवी आहे. त्यांचे भाषण ऐकून मला वाईट वाटले अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिले. हा महाराष्ट्राचा, राज्य सरकारचा आणि डॉक्टरांचा अपमान असून याबद्दल राज्य सरकारने अधिकृत भूमिका घ्यावी, मी एकट्याने बोलण्याचा ठेका घेतलेला नाही असेही राऊत म्हणाले.
दिल्लीत पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, मी महाराष्ट्राभिमानी आहे,मी महाराष्ट्राचा खासदार आहे. करोना ही महामारी जगभरात पसरली आहे. चीनमधून या महमारीचा उगम झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत काही तथ्य मांडली आहेत. त्यामुळे करोनासाठी महाराष्ट्राला जवाबदार धरणे चुकीचे आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेने धारावी पॅटर्नचे कौतुक केले.
महाराष्ट्र राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने करोना काळात चांगले काम केले याचे सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना उदाहरण दिले. अशा प्रकारे करोनाचे खापर महाराष्ट्रावर फोडणे महाराष्ट्र सरकारचे, साडे अकरा कोटी जनतेचा आणि कोरोना काळात डॉक्टर, नर्स, आरोग्य अधिकारी यांनी काम केले त्यांचा अपमान आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याबद्दल पुढे येऊन बोलले पाहिजे असेही राऊत म्हणाले.
सोनू सूदला राजभवनात नेणारे कोण होते ? सोनू सूदचा राज्यपालाच्या हस्ते सत्कार करणारे कोण होते. राज्य सरकारला मजुरांना पाठवणे जमत नाही ते सूद करतोय म्हणून कौतुक करणारे कोण होते? राज्य सरकार म्हणत होते की याबाबत घाई करू नका. तरी याबाबत राज्य सरकारने आपली अधिकृत भूमिका मांडावी. प्रत्येके वेळी बोलण्याचा ठेका मी घेतलेला नाही. याबाबत राज्यसरकार काय करत आहे? असेही राऊत यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या आरोपाचे पोलीस बघतील असे राऊत म्हणाले. तसेच किरीट सोमय्या यांनी जो बायडेन यांना भेटावे, आंतरराष्ट्रीय न्यायालयात जावे. या राज्यात कायदा सुव्यवस्था आहे. आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या झालेल्या हल्ल्याचाही मी निषेध केला आहे. या देशात आणि राज्यात कायदा सुव्यवस्था आहे. आरोपांची राळ उडवून चालणार नाही. हे मी व्यक्तिगत बोलत नसून कुणावरही खुनी हल्ला झाला असेल, तर कायदा काम करत असतो. कायद्याच्या कचाट्यातून कोणीही सुटत नाही. आम्ही न्यायालयांचे मालक नाहीत. न्यायालयांचे मालक कोण आहेत हे सगळ्यांना माहित आहेत असेजी राऊत म्हणाले.