कोपरगाव – देशात व राज्यात भाजप महायुतीची लाट असून, त्याचे प्रत्यंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले. तेव्हा येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्हाच भाजपमय करून सर्वच्या सर्व जागा भाजपा सेना महायुतीच्या निवडून आणून बारा विरुद्ध शून्य, असा इतिहास घडविण्यांचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना व संजीवनी उद्योगसमूहाच्या वतीने खा. डॉ. विखे यांचा कारखाना कार्यस्थळावर सत्कार करण्यांत आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते दत्तात्रय कोल्हे होते. यावेळी आ. स्नेहलता कोल्हे, कारखान्याचे अध्यक्ष बिपिन कोल्हे, कोपरगाव औद्योगीक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, कारखाना संचालक शिवाजीराव वक्ते, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, अप्पासाहेब दवंगे, अरुणराव येवले, अशोकराव औताडे, माजी सभापती सुनील देवकर, भास्करराव भिंगारे, प्रदीप नवले, पांडुरंगशास्त्री शिंदे, रिपाइंचे दीपक गायकवाड, अशोकराव भाकरे, विलासराव वाबळे, बाळासाहेब नरोडे, फकिरराव बोरनारे, शहराध्यक्ष कैलास खैरे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते आजी-माजी संचालक उपस्थित होते. भाजप तालुकाध्यक्ष शरद थोरात यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
खा. डॉ. विखे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत वैचारिक पातळी सोडून विखे कुटुंबावर जुन्या जाणत्या नेत्यांसह अनेकांनी टीका टिप्पणी केली. पण आपण कधीही पातळी सोडली नाही व सोडणार देखील नाही. मतदारांनी मात्र त्याचे उत्तर त्यांना दिले आहे. आ. कोल्हे म्हणाल्या, खासदार डॉ. विखे यांची बेधडक निर्णय घेऊन काम करण्याची त्यांची हातोटी आहे.