कर्मचाऱ्यांची उडाली धावपळ ः दोन अग्निशमन बंबांनी विझविली आग
कर्मचारी-अधिकाऱ्यांत शाब्दिक चकमक
आगार व्यवस्थापक अभिजीत चौधरी यांनी आग लागल्याची माहिती दूरध्वनीवरून नगरपालिकेच्या अग्निशमन विभागास दिली. परंतु आगीचे रौद्ररूप बघून त्यांची देखील धांदल उडाली. त्या गडबडीत चौधरी यांनी दूरध्वनीवरून नाव न सांगता मी आगार व्यवस्थापक बोलतोय, असे सांगितले. त्यामुळे आग विझल्यानंतर नाव सांगण्याच्या कारणावरून चौधरी व अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांत शाब्दिक चकमक उडाली.
कोपरगाव – राज्य परिवहन महामंडळाच्या कोपरगाव आगारातील ग्रीस व ऑईलच्या टाकीला आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने वेळेत आग विझविल्याने मोठी दुर्घटना टळली.
याबाबत अधिक वृत्त असे की, महामंडळाचे शहरात बसस्थानक व आगार आहे. नेहमीप्रमाणे आगारात कर्मचारी काम करीत होते. दरम्यान आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कार्यशाळेपासून पश्चिमेस ठराविक अंतरावर ठेवलेल्या वाया गेलेल्या ग्रीस व ऑईलच्या लोखंडी टाकीने अचानक पेट घेतला. रणरणते ऊन असल्याने बघता-बघता आगीच्या ज्वाळा उंच हवेत पसरल्या. सर्वत्र धूरच धूर दिसू लागल्याने काळाकुट्ट अंधार झाला.
आगार व्यवस्थापक अभिजित चौधरी यांनी तातडीने पालिकेच्या अग्निशमन विभागास दूरध्वनीवरून आग लागल्याचे कळविले. त्यानंतर काही वेळात अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले. या बंबांनी आग आटोक्यात आणली. आगीपासून उत्तर दिशेला काही अंतरावर महसूल विभागाने जप्त केलेली अवैध वाळूची वाहने उभी होती. सुदैवाने त्यांना आग लागली नाही. अन्यथा अनर्थ झाला असता. अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठी हानी टळली. घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती.