अवसरी(पुणे) – आंबेगाव तालुक्यातील टाव्हरेवाडी (अवसरी बुद्रुक) येथे बिबट्याचा वावर वाढला आहे. परिसरातील शेतकरी आणि नागरिकांना जीव मुठीत धरून शेतात जा-ये करावी लागत आहे. तरी वन विभागाने या भागात पिंजरा लावावा, अशी मागणी सरपंच उत्तम टाव्हरे यांनी केली आहे.
अवसरी बुद्रुकच्या उत्तरेस दीड किलोमीटर अंतरावर टाव्हरेवाडी हे गाव आहे. टाव्हरेवाडी ते चिंतामणी पाणी पुरवठा योजना या भागात बिबट्याचा वावर वाढला आहे. या भागात निवासी वस्ती, शेतकरी तसेच शेतमालाची तोडणी, वाहतूक, शेतीची कामे शेतकरी करत असतात. तसेच दूध वाहतूक होत असते. या पूर्वी अनेक वेळा शेतकरी, नागरिकांना बिबट्या चे दर्शन झाले आहे. त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिक शेतकरी बिबट्याचा दडपणाखाली आहे.